खंडाळा – खंडाळा तालुक्यातील अनेक प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींनी वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले. त्यामुळे आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केली.
पुरुषोत्तम जाधव यांच्या उपस्थितीत भादे गणात विविध विकासकामांचा शुभारंभ नुकताच झाला. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, तालुक्याचे प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पाणीप्रश्न, लोहम-मांढरदेव रस्ता, खंडाळ्यातील ट्रॉमा केअर सेंटर अशा प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असून, सरकारचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मी जनतेने निवडून दिलेला प्रतिनिधी नसतानाही या कामांसाठी प्रयत्नशील आहे.
या कार्यक्रमात बावकलवाडी येथे जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत, वाघोशी, कराडवाडी व अंदोरी येथील स्मशानभूमी सुशोभिकरण, शेडगेवाडी व भादे येथे रस्ता काँक्रिटीकरण, वाठार बुद्रुक येथील हनुमान मंदिरात पेव्हर ब्लॉक बसवणे या कामांचा शुभारंभ करण्यात आला. वाघोशी व बावकलवाडी येथे शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, तालुकाप्रमुख भूषण शिंदे, समन्वयक व्ही. डी. वाघमारे, पंचायत समितीच्या माजी सदस्या शोभा जाधव, सरपंच निलांबरी बुणगे, गणेश केसकर, श्रीधर सोनवलकर, गुलाब धायगुडे, सचिन धायगुडे, कृष्णा बरकडे, बाळासाहेब जाधव, नामदेव साळुंखे, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रलंबित प्रश्नांवर आमदारांचे मौन
आपल्या मतदारसंघाचे प्रश्न आमदार सभागृहात कधी मांडणार? लोकांच्या समस्यांवर आमदारांचे मौन आहे. त्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे, असे प्रदीप माने म्हणाले.