सातारा – लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीने येथील गांधी मैदानावर लोकसभेचे रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे. येत्या रविवारी दि. 14 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता महायुतीच्या कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा गांधी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या तयारीची माहिती येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीनंतर देण्यात आली.
या बैठकीस पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, अजित पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अशोकराव गायकवाड, रयत क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे इत्यादी यावेळी उपस्थित होते. गांधी मैदानावर महामेळावा घेऊन लोकसभेची वातावरण निर्मिती करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पालकमंत्र्यांनी संबोधित केले. या मेळाव्यासाठी किमान पाच हजार कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहतील असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला
देसाई म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 45 हून अधिक खासदार निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. राज्यातील महायुती एकत्र आहे. महायुतीतील राज्याच्या वरिष्ठ कार्यकारिणीने ठरवलेल्या कार्यक्रमाप्रमाणे पहिला मेळावा घेण्यात येत आहे. सातारा व माढा मतदारसंघात महायुतीचे खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे. राज्यातील तिन्ही गट एकत्र असून वरिष्ठ नेते देतील त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू. सातारा लोकसभा मतदारसंघ ज्या पक्षाला मिळेल त्या पक्षाच्या उमेदवाराचे काम महायुती करणार असल्याचा स्पष्ट निर्वाळा पालकमंत्र्यांनी दिला. महाविकास आघाडीला जनता कंटाळली आहे.
पालकमंत्री म्हणून मी अत्यंत सकारात्मक आहे. महायुतीच्या या मेळाव्यामध्ये पुढील लोकसभा निवडणुकांची रणनीती स्पष्ट केली जाईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पंतप्रधान मोदी यांच्या विकास रथाला काही ठिकाणी विरोध झाला, या विरोधाविषयी पालकमंत्री म्हणाले, मोदींना विरोध करणाऱ्यांची माहिती घेतो. विरोध का होत आहे याची माहिती घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्यातील नेते जो ठरवतील तोच उमेदवार आणि त्याला ताकद देण्याचे काम महायुती सातारा जिल्ह्यात करेल. शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नसून महायुती अखंड आहे. सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असा दावा पालकमंत्र्यांनी केला.
महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार शिवेंद्रसिंहराजे
महायुती एकसंध असेल तर साताऱ्यातील दोन्ही राजांमधील कलगीतुरा मिटलाय का? या प्रश्नावर पालकमंत्री म्हणाले, आता कार्यक्रमात दोघांनी गळाभेट घेतली. त्यांच्यामध्ये कोणताही वाद नाही. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनात लोकसभेचा कोणता उमेदवार आहे? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचे काम करू. मात्र, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य होते. ही पत्रकार परिषद महायुतीच्या मेळाव्यासंदर्भात आहे खासदारकीच्या उमेदवारीवरून कोणाची नाराजी आहे हे उमेदवार ठरल्यानंतर बघू. त्यावेळी तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल, अशी टिपणी आमदार जयकुमार गोरे यांनी करत महायुती अभंग असल्याचे पत्रकारांना सांगितले