आजचे राज्यकर्ते खाणाऱ्यांचा विचार करतात पिकवणाऱ्यांचा नाही
हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. दरम्यान, आजचे राज्यकर्ते खाणाऱ्यांचा विचार करतात मात्र पिकवणाऱ्यांचा विचार करत नाहीत, अशी टीका पवारांनी केली. तसेच पक्षांतराच्या मुद्दयांवर देखील त्यांनी भाष्य केले.
“आज अनेक लोक आम्हाला सोडून विरोधी विचारांच्या पक्षात जात आहेत. मला अशा लोकांची काहीच चिंता नाही. ते जाताना सांगतात की पवार साहेब आमच्या हृदयात आहेत. तुझ्या हृदयात जर पवार साहेब मग गेला कशाला ?”, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.
शरद पवार म्हणाले, हे लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करणारे लोक आहेत. मात्र मी तसा नाही. ज्या खेड्यापाड्यातील लोकांनी आम्हाला मदत केली, शेवटच्या श्वासापर्यंत त्या माणसांसाठी झटणार, हा निर्धार कायम आहे.
मी देशातील कृषी खात्याचा प्रमुख होतो. कांदा आम्ही बाहेरगावी पाठवला त्यामुळे कांद्याच्या किंमती वाढल्या होत्या. भाजपचे लोक तेव्हा माझ्या अंगावर धावून आले. तेव्हा मी कुणाला न जुमानता जोपर्यंत पदावर आहे कांद्याला भाव देणार अशी भूमिका घेतली.
ज्या भागात कापूस उत्पादन होते त्या भागात टेक्सटाईल पार्क्स उभी करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यावेळी वसमतमध्येही टेक्सटाईल पार्क उभे केले. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कारखाने सुरू झाले. मात्र आता फक्त तीस कारखाने सुरू आहेत. आम्ही सुरू केलेले कारखाने यांनी बंद केले.