मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणीने काल एक ठराव संमत करून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
त्यावर प्रतिक्रीया देताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे की त्यांना सीबीआय चौकशीचीच मागणी करायची असेल तर त्यांनी आधी राम मंदिराच्या नावाने अयोध्येत जे जमीन घोटाळे झाले आहेत त्याच्या सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी करायला हवी होती.
सीबीआय चौकशीच्या मागणीचा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारीणीत कसा होऊ शकतो असा सवाल करून त्यांनी म्हटले आहे की, सीबीआय किंवा ईडी हे भाजपचे कार्यकर्ते किंवा त्यांची पक्षीय यंत्रणा नाही.
सीबीआय आणि ईडी म्हणजे भाजप आयटी सेल आहे काय? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. ते म्हणाले की भारतीय जनता पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणांची अप्रतिष्ठा केली आहे. सीबीआय किंवा ईडी या संस्थांनी राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न करणाऱ्या घटनांच्या बाबतीत चौकशी केली किंवा सरकारी तिजोरीला नुकसान पोहोचवणाऱ्या घटनांची चौकशी केली तर समजू शकते पण भाजपचे लोक या संस्थांची अशी अप्रतिष्ठा का करीत आहेत असा सवालही त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दोन वर्ष पुर्ण होत आली असून हे सरकार उर्वरीत तीन वर्षाच्या काळातही टिकेल असा विश्वासही राऊत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केला. सरकारला अस्थिर करण्याच्या कोणत्याही खेळ्या यशस्वी होंणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. सीबीआय आणि ईडीने अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या छाप्याच्या कारवाईवरही त्यांनी टीका केली.