मुंबई – राज्यातील 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने झेंडा फडकावला आहे. पाच वाजेपर्यंतच्या निकाला अखेर सत्ताधारी शिंदे आणि भाजप गटाला अवघ्या 31 बाजार समित्यांमध्ये विजय प्राप्त झाला आहे. यावरूनच आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
काल राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल लागले. या निकालात महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांवर वरचढ ठरताना दिसली. यावेळी राज्यातील बहुतांश नेत्यांनी आपापले बाजार समित्यांमध्ये गड राखले आहेत.तर काहींना मोठे धक्के देखील सहन करावे लागले आहेत. यावरूनच आता संजय राऊत यांनी एक ट्विट करत सत्ताधाऱ्यांना महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचं आव्हान दिल आहे.
संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,”बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेसह महविकास आघाडीस उत्तम यश मिळाले. गद्दार आमदारांचे शेतकरी मतदारांनी करेक्ट कार्यक्रम केलं. हेच महाराष्ट्राचे जनमानस आहे. ही सुरुवात आहे. महानगर पालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत असाच जोरदार कार्यक्रम होईल. लोकांनी खोके लाथाडले .हे स्पष्ट दिसते.हिम्मत असेल तर महानगर पालिका निवडणुका घेऊन दाखवा”
पुण्यात काय घडलं
पुणे जिल्ह्यातील नऊ कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत दोन धक्कादायक निकाल वगळता सात बाजार समितीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस, तसेच दोन ठिकाणी महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दौंड बाजार समितीत भाजपाने प्रबळ राष्ट्रवादीला झुंजवित सामना बरोबरीत सोडविला आहे. तर दुसरीकडे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे पॅनल चारीमुंड्या चीत झाले.