संयुक्त राष्ट्र – “भारत’ असे अधिकृत नाव बदलण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रासमोर ठेवण्यात आल्यास त्याचा विचार केला जाईल, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. “जी-20’च्या मेजवानीच्या निमंत्रणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नाव “इंडिया’च्या ऐवजी “भारताच्या राष्ट्रपती’ असे छापले गेल्याच्या पार्श्वभुमीवर संयुक्त राष्ट्राने ही तयारी दर्शवली आहे.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनिओ ग्युटरेज यांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी काल ही माहिती देताना गेल्या वर्षी “तुर्की’चे नाव बदलून “तुर्कीये’ केले गेल्याचा दाखला दिला.
“इंडिया’चे नाव बदलून भारत केले जाऊ शकते या वृत्तावरील प्रश्नाला उत्तर देताना “तुर्की’चे नाव बदलून “तुर्कीये’ करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव तुर्कीच्या सरकारने मंजूर करून संयुक्त राष्ट्रकडे पाठवण्यात आला होता. आम्हाला तशी विनंती मिळाली तर आम्ही त्याचा विचार करू, असे ते म्हणाले.
“जी-20’च्या मेजवानीच्या निमंत्रण पत्रिकेवर “इंडिया’ ऐवजी “भारत’छापले जाण्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाऊ लागली आहे. त्यातूनच केंद्र सरकार देशाचे नाव बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून केला जाऊ लागला आहे. मात्र या संदर्भातील कोणत्याही वादामध्ये न पडण्याची सूचना पंतप्रधानांनी काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना केली आहे.