काश्मोर (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील काश्मोर येथे हिंदू आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. कंधकोट भागातील कच्छा येथे अपहरण झालेल्या हिंदू उद्योजकांची सुटका करण्यात स्थानिक पोलिसांना अपयश आल्याच्या निषेधार्थ स्थानिकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या लसाठीमारामध्ये रक्तबंबाळ झालेल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गेल्या पाच महिन्यांत या परिसरातून शंभरहून अधिक लोकांचे अपहरण करण्यात आले आहे. या अपहरणांच्या विरोधात कंधकोट-कश्मोर जिल्ह्यात प्रचंड धरणे आंदोलन सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांत सुमारे शंभर जणांचे अपहरण करण्यात आले आहे. ओलिस घेतलेल्यांमध्ये हिंदू आणि मुस्लिमांसह पठाण, सिंधी, पंजाबी आणि बलूच देखील आहेत.
खंडणीसाठी त्यांचे अपहरण करण्यात आले आहे, असे स्थानिक प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. अपहरणाच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांनी आपल्या मुलांना शाळेमध्ये जाऊ देणे देखील बंद केले आहे. कश्मोर जिल्ह्यात मोठ्या संख्येने राहणारे हिंदू व्यापारी हे अपहरण करणाऱ्या डाकूंचे सोपे लक्ष्य बनले आहेत. अल्पसंख्यांविरोधातील वाढत्या अत्याचारांमुळे काश्मोर जिल्ह्यातील बाजारपेठही बंद ठेवण्यात आली आहे.
अपहरण करणाऱ्या डाकूंना पोलीस सहाय्यच करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आंदोलनाच्या दबावाखाली पोलिसांनी अपहरण झालेल्या काही व्यक्तींची सुटका केली, तर अपहरणकर्ते येत्या काही दिवसांत त्यांचे किंवा अन्य व्यक्तींचे पुन्हा अपहरण करतील, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी धरणे आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार केल्यानंतरही या आंदोलकांनी आपले धरणे आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे.