नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात कानपूर येथे मुस्लिम धर्मगुरूंच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. अलिकडे विवाह समारंभात अनावश्यक खर्च केला जातो. हा खर्च कमी करून ती रक्कम सत्कारणी लावण्यासाठी इस्लामचा हवाला देत हे खर्च थांबवावेत असे आवाहन करण्यात आले आहे व त्याचसोबत बँड आणि डीजे लावून लग्न करणाऱ्यांना इशाराही देण्यात आला आहे.
लग्नात जर बँड, बाजा आणि डीजे वाजवण्यात आले तर काझी लग्न लावणार नाहीत असे बजावण्यात आले आहे. कानपूरच्या ग्रामीण भागात झालेल्या धर्मगुरूंच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेल्यानंतर तसे फर्मान जारी करण्यात आले. हैदरस्ल मशिदीत इमाम आणि मौलाना उपस्थित होते. त्यांनी विवाह सोहळे साधेपणाने झाले पाहिजेत याबाबत एकमत व्यक्त केले. इस्लाममध्ये अनावश्यक खर्चाला मनाई आहे. हा जो खर्च केला जातो ती रक्कम वाचवून गरीब मुलींचे विवाह लावून देता येऊ शकतात. मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणावर ती रक्कम खर्च केली जाऊ शकते. त्यामुळे साध्या पध्दतीने केल्या जाणाऱ्या विवाहांना प्रात्सहन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
सर्व मुसलमानांना या नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गैर इस्लाम पध्दतीने होणाऱ्या विवाहांना लगाम घालण्याची गरज असल्याचे मतही नोंदवण्यात आले.
दरम्यान, या निर्णयांमुळे बरीच चर्चा सुरू झाली आहे. तर राजपूर जामा मशिदीचे मौलाना अनीस उर रहमान यांनी धर्मगुरूंच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांचे समर्थन केले. ते म्हणाले की अनेक गरिब मुलींच्या लग्नांत अडचणी येत आहेत, मात्र समाजातील प्रबुध्द वर्ग अनावश्यक खर्च करणे थांबवत नाहीये. त्यामुळे बँड, बाजा आणि डीजेला बंदीचा निर्णय घेण्यात आला. नूरी मशिदीचे मौलाना सय्यद इमाम अलि यांनीही मुस्लिम बांधवांना असेच आवाहन केले आहे.