अमोल मतकर,
संगमनेर – विवाह समारंभ किंवा एखाद्या निवडणुकीचा निकाल असेल, बेधुंद झालेल्या डीजेच्या आवाजावर तरुणाई थिरकत असते. मोठ्या आवाजात वाजत असताना कुणाच्या घरातील भांडे पडतात, कुणाच्या खिडक्यांच्या काचा फुटतात, कधी कधी तर कानांचे पडदे तुटतात, हृदयाला धक्का बसून मृत्यू ओढावल्याचे अनेक घटना घडल्याचे ऐकवित आहेत. तरी देखील याचं कोणालाही सोयरसुतकं नसल्याचे दिसत आहे. मग या डीजेच्या आवाजाला नेमकं जबाबदार कोण आहे, प्रशासन, राजकारणी की जनता? या प्रश्नाचं उत्तर शोधणं कठीण होतं.
गुरुवारी (दि.४) संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील नवरदेवाच्या मिरवणुकीत झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यानिमित्ताने सर्वत्र चर्चांना उधाण आलं असून नेमकं या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. डीजेसाठी वापरली जाणारी वाहने ही जुनी असतात.
कालमर्यादा संपलेल्या वाहनांना तयार करून स्पीकरच्या भिंती उभ्या केल्या जातात. त्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा परवाना नसतो, वाहनांची कागदपत्रे नसतात, चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतो. तरी देखील सार्वजनिक उत्सवांच्या वेळी सगळीकडे स्पीकरच्या मोठ्या भिंती वापरण्याचे प्रमाणे वाढले आहे. त्याबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नाही, असाच सर्वसामान्यांचा अनुभव आहे. ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश असतानाही ते सर्रासपणे पायदळी तुडवले जातात. यामुळे उल्लंघन करणार्या व्यक्तींवर गुन्हे दाखल होणे अपेक्षित आहे. परंतु तसे घडताना दिसत नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी प्रशासनच डीजे वापरासाठी जबाबदार असल्याचे दिसून येते.
नेत्यांच्या मिरवणुकीतील स्पीकरच्या भिंतीमुळे धोक्याच्या पातळीच्या दुपटीहून अधिक आवाज असतो. एरव्ही समाज माध्यमांवर आपल्या नेत्यांबद्दल किंवा आपल्या गैरसोयीची प्रतिक्रिया उमटल्यानंतर काही तासांमध्ये प्रतिक्रिया देणारे राज्यकर्ते आणि नेते या जनआक्रोशाबाबत मात्र मौन बाळगून असतात. मिरवणुकीत झालेले काही मृत्यूही या स्पीकरच्या भिंतीमुळे (डीजे) झाल्याचे दावे करण्यात येत आहेत. याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र, या सर्व घटनांमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमधून असे प्रकार थांबवण्याची मागणी होत आहे. या परिस्थितीमध्ये त्यांना दिलासा देण्यासाठी या डीजेवर बंदी घालण्याचे धाडस दाखविले जाईल काय, असा प्रश्न भाबडी जनता विचारत आहे.
एकीकडे डीजेचा आवाज वाढला आणि पारंपरिक वाद्यांचा आवाजच बंद झाला. डीजेमुळे आबालवृद्धांना त्रास होतो, अनेक अपघात होतात, क्षणाचा आनंद कुणाचे तरी जीवन उद्ध्वस्त करतो. हे सगळं माहीत असूनही जनता डीजेलाच पसंती का देतात? हे न उलगडलेलं कोडं आहे. जनतेने ठरवले तर काहीही होऊ शकते, हे मात्र तितकेच खरे असून आता जनतेनेच समोर येऊन डीजे वापरावर बंदी घालून पारंपरिक वाद्याला पसंती देण्याची गरज आहे. त्यामुळे काही अंशी का होईना, जनता ही डीजे वापरला जबाबदार असल्याचे दिसून येते असे म्हणण्याला वाव आहे.