यशवंतनगर – ज्या मतदारसंघात आमचा प्रतिनिधी नाही त्या मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार विकासाची गंगा आणली. सबका साथ सबका विकास हेच आमचे धोरण आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकास काय असू शकतो हे अवघ्या महाराष्ट्राने बघितलं आहे. अजून सहा महिने मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री आहे. तुम्ही शब्द द्या, येणाऱ्या निवडणुकीत कराड उत्तरचा आमदार भारतीय जनता पक्षाचा असेल, कराड उत्तर मतदारसंघात विकासनिधी कमी पडून देणार नाही, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
पार्ले (ता. कराड) येथे झलेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. मंत्री चव्हाण म्हणाले, येत्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने तुमच्या भेटीला मी पुन्हा येईन. पूर्ण ताकदीने भाजपच्या पाठीशी उभे राहा. ज्या भागात विकास झाला नाही त्या भागात विकासाची गंगा पोहोचली पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे.
यावेळी आ. जयकुमार गोरे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, सरचिटणीस किसान मोर्चा रामकृष्ण वेताळ, सागर शिवदास, भीमराव पाटील, सचिन नलवडे, सरपंच अश्विनी मदने, मोहन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार जयकुमार गोरे म्हणाले, माण खटाव मतदार संघाचा जो विकास आम्ही केला तो विकास येथील आमदारांना करता आला नाही. पण कराड उत्तरच्या आमदारांनी काय केले? हा मतदारसंघ विकासापासून वंचित ठेवण्याचे काम केले. विकासासाठी कराड उत्तरचा आमदार भारतीय जनता पक्षाचा असला पाहिजे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप ताकदीने उभा राहतोय. कराड उत्तरचे वातावरण बदलले आहे. मला प्रस्थापितांच्या विरोध लढण्याची आणि सामान्य माणसाला न्याय द्यायची सवय आहे.
यावेळी रामकृष्ण वेताळ म्हणाले, कराड उत्तरमध्ये विद्यमान आमदारांनी कोणत्याही प्रकारचा निधी आणला नाही याठिकाणी भारतीय जनता पक्षाने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यावेळी धैर्यशील कदम, मनोज घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले.