मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांची एक घणाघाती मुलाखत २६ आणि २७ जुलै या दोन दिवशी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेच ही मुलाखत घेणार आहेत. त्याचा टिझर नुकताच रिलिज झाला होता. त्यानंतर आता या मुलखातील प्रोमो आऊट आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या ट्वीटर पेजवर या मुलाखतीचा पहिला प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख खेकडा असा केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून जे म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला त्यावरही भाष्य केले आहे.
तुमच्या नेतृत्वाखालील सरकार मागच्या वर्षी मुसळधार पावसात वाहून गेलं.. असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे “सरकार वाहून गेलं नाही तर खेकड्याने धरण फोडलं.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. तसंच इतरही अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. हा प्रोमो चांगलाच चर्चेत आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “आम्हाला खेकडा म्हणता तर म्हणा. पण लक्षात ठेवा खेकडाच कावीळवर योग्य पर्याय ठरतो. या खेकड्यांना जपले असते तर शिवसेना फुटली नसती, असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाताय ही चांगली बाब आहे. आम्हाला एक कळत नाही आमचा दोष काय होता? आता कोण कुठे जाऊन मुजरा करतो हे पाहावे लागेल. तुम्ही दिल्लीत जाऊन राम राम करायचा तेव्हा काय?, असे प्रतिप्रश्न गुलाबराव पाटील यांनी केले आहेत.