मुंंबई – अभिनेते नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी छाप निर्माण केली आहे. अनेकदा नाना पाटेकर त्यांच्या वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात. राजकारण आणि समाजकारण यावर अनेकदा ते भाष्य करताना दिसतात. त्यांच्या या विधानामुळे साऱ्यांचे लक्ष वेधले जाते. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार लवकरच महाराजांची वाघनखं भारतात परत आणणार आहे. यासाठी ते महिनाअखेरीस लंडनला रवाना होणार आहे. यानिमित्त त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना एक सल्ला दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला होता, ती वाघनखं ब्रिटनमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार करार करणार आहे. ती वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अॅल्बर्ट संग्रहालयात आहेत. सर्व काही ठरल्याप्रमाणं घडलं तर या वर्षीच ही वाघनखं भारतात परत आणण्यात येतील, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यावर नाना पाटेकर यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.
फेसबुकवर पोस्ट करत त्यानी लिहिलं, ‘मुनगंटीवार महाराजांची वाघनख आणताय त्या बद्दल अभिनंदन…जमल तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा…’ त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी देखील त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की,’ यांच्या भ्रष्टाचाराचा कोथळा काढायला, ते वाघ नखेही बोधट होतील” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, “वा.. नाना साहेब जनतेच्या मनातील बोलले.”
दरम्यान, सुधीर मनुगंटीवार यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघ नखे या वर्षीच महाराष्ट्रात येणार आहे. ब्रिटन सरकारकडून या संदर्भातील पत्र मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करणार आहे. लंडनमधील विक्टोरिया एंड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ही वाघनखं ठेवण्यात आली आहे. सगळ्या औपचारिकता वेळेत पूर्ण झाल्यास या डिसेंबरपूर्वीच वाघनखं महाराष्ट्रात आणली जाण्याची शक्यता आहे.”