नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये सहा एप्रिल रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक आपले जाहीरनामेदेखील प्रसिद्ध केले आहेत. त्या जाहिरनाम्यांमध्ये लोककल्याणासंदर्भातील योजनांची यादीच प्रसिद्ध केली आहे. यासर्वांमधे सध्या सर्वात जास्त एक जाहीरनामा चर्चेत आला आहे. कारण या जाहीरनाम्यामध्ये एका उमेदवाराने अगदी आयफोन, हेलिकॉप्टरदेण्याचे आश्वासन दिले आहे. पण हे एव्हढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी चक्क चंद्रावर सहल नेण्याचेही आश्वासन दिले आहे.
दक्षिण मदुराई मतदारसंघामधून आर.सर्वनान हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी प्रसिद्ध केलेला जाहीरनाम सध्या प्रचंड चर्चेत आहे. सर्वनानने आपल्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक घरात एक आयफोन, गाडी, हेलिकॉप्टर, रोबोट होडी आणि घरात वापराच्या अनेक वस्तू देण्याचं आश्वासन दिलं आहे. आपल्या जाहीरनाम्यातील सर्व गोष्टी खऱ्या असल्याचं सर्वनान सांगतो. मी जिंकल्यास मतदारसंघामधील प्रत्येक घरात एक आयफोन, गाडी, हेलिकॉप्टर, होडी, रोबोट तर देईलच पण प्रत्येक घरातील एका व्यक्तीच्या नावे तीन मजल्याचे घरही बांधून देईन. या घराच्या गच्चीवर स्विमिंग पूल असेल, असा दावा सर्वनानने केला आहे. तसेच तरुणांसाठी एक कोटींचा निधी राखीव असेल. त्याचप्रमाणे चंद्रावर १०० दिवसांसाठी सहल घेऊन जाईन अशा शब्दही सर्वनानने आपल्या मतदारांना दिलाय.
प्रत्येक घरासाठी देण्यात येणाऱ्या वस्तूंबरोबरच सर्वनानने अनेक सर्वजनिक उपक्रम आणि मोठे प्रकल्प उभारण्याचंही आश्वासन दिलं आहे. यामध्ये अवकाश संशोधन केंद्र, रॉकेट लॉन्चिंग साईट, ३०० फूट उंचीचा कृत्रिम हिमकडा उभारणार असल्याचं सर्वनाने नमूद केलं आहे. मतदारसंघामध्ये उन्हाळ्याचा अनेकांना त्रास होत असल्याने हिमकडा उभारला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणामध्ये प्रवेश करावा यासाठी विशेष प्रयत्न आपण करु असंही सर्वनानने म्हटलं आहे. “आपल्यापैकी अनेकांना निवडणुकीमध्ये कसं सहभागी व्हायचं हे ठाऊक नसतं. मी ही पद्धत शिकून घेण्यासाठी निवडणूक लढवत आहे. लोकांना माहिती देण्यात आली तर राजकारणी घबरतील. असं झाल्यास चांगलं प्रशासन आणि राजकीय नेते आपल्याला मिळतील,” असं सर्वनान सांगतो.
Madurai South makkaley… Bonanza awaits you. This guy is promising ₹ 1 crore in your account (not jujubi ₹ 15 lakh). pic.twitter.com/L4KnEH2lx6
— RadhakrishnanRK (@RKRadhakrishn) March 24, 2021
“निवडणूक लढवण्यासाठी मी २० हजारांचे कर्ज काढलं आहे. त्यापैकी १० हजार रुपये मी अर्ज भरताना खर्च झालेत. दक्षिण मदुराईमध्ये दोन लाख ३० हजार मतदार आहेत. जर ५० तरुण निवडणुकीला उभे राहिले आणि प्रत्येकाने ५० मतं जरी मिळवली तरी कोणत्याच पक्षाला तामिळनाडूमध्ये विजय मिळवता येणार नाही. ते लोकांना घाबरतील. मी याचसंदर्भातील जागृती करण्यासाठी निवडणूक लढवत आहे,” असे सर्वनाने स्पष्ट केले आहे.
अनेकांनी सर्वनानचा हा जाहीरनामा उपहासात्मक पद्धतीने बनवण्यात आला असल्याचे सोशल मीडियावर म्हटले आहे. वाट्टेल ती आश्वासने देणाऱ्या मंत्र्यांना चिमटा काढण्यासाठी सर्वनानने हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्याचे बोलले जात आहे. अनेकदा निवडणुका जिंकून झाल्यावर नेते त्यांची आश्वासन विसरतात म्हणूनच ते निवडणुकीत वाटेल ती आश्वासने देतात हा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न सर्वनानने केल्याचे काहींना वाटत आहे.
या जाहीरनाम्यातील आश्वासनांसंदर्भात विचारण्यात आले असता सर्वनानने, “मागील ५० वर्षांपासून राजकीय पक्ष लोकहिताच्या योजनांचे आश्वासने देत निवडणुका जिंकत आहेत. त्यांनी सत्तेत आल्यानंतर कधीच लोकांची सेवा केली नाही. याचसंदर्भात जागृती करण्यासाठी मी हा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय जो यापूर्वी जगात कोणीच केला नव्हता,” असे म्हटले.