सातारा – सातारा मतदारसंघातून उमेदवारीसाठी तीन दिवसांपासून भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांना शनिवारी दिलासा मिळाला. अनेक बैठकांनंतर दिल्लीमध्ये केंद्रीय निवड समितीने खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठी अनुकूलता दर्शवल्याची खात्रीशीर माहिती आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. उदयनराजे यांच्या उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळा झाला असून या उमेदवारीची औपचारिकता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून बाकी असल्याची माहिती आहे.
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील 32 जागांपैकी बहुतांश जागा अंतिम केल्या आहेत. त्यामध्ये सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत संभ्रमावस्था कायम होती. अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचा दावा सांगून उदयनराजे भोसले यांनाच आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र, उदयनराजे भोसले कमळाच्या चिन्हावरच निवडणूक लढवायची असाच चंग बांधून गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये आपल्या मावळ्यांसह तळ ठोकून होते.
उदयनराजे यांना सातारा लोकसभेचे तिकीट मिळणार का याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. केंद्रीय निवड समितीच्या दोन बैठका होऊन या बैठकांमध्ये सातारा लोकसभेची जागा भाजपला देऊन तेथे उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव निश्चित करण्यात यावे अशा विषयावर सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. केंद्रीय निवड समितीने उदयनराजे भोसले यांना अनुकूलता दर्शवल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे साताऱ्यात राजे समर्थकांनी जल्लोष केला असून केंद्रीय समितीकडून जणू उदयनराजे यांनी लोकसभा मतदारसंघात तयारीला लागावे असाच संदेश दिल्याची भावना आहे.
सातारा लोकसभेसाठी यावेळी जनतेतून निवडून जायचे या इराद्याने उदयनराजे यांचा ठाम निर्धार पाहून भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीने त्यांना उमेदवारीला अनुकूलता दाखवून त्यांचा जणू मान राखला आहे अशी भावना राजे समर्थकांनी व्यक्त केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यांच्याशी कमराबंद चर्चा केली. केंद्रीय निवड समिती व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याशी जागावाटपाच्या संदर्भात निर्णायक बैठक असल्याची माहिती आहे.