निवृत्त अधिकारी लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांचे प्रतिपादन
पुणे – बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारतीय सैन्याचे योगदान अमूल्य आहे. या मुक्तीसाठी लढताना भारतीय सैन्यातील 17-18 वर्ष वयाचे सैनिक धारातीर्थी पडले. त्यांचे हे हौतात्म्य विसरता येणार नाही. भारत आणि बांगला देशातील संबंध रक्त आणि परिश्रमाने जोडलेले आहेत.
नवीन पिढीला त्याची माहिती करून देण्याची गरज आहे. 1971 च्या मुक्ती संग्रामाचे ऋण हे पैशाने फेडता येण्यासारखे नाहीत, असे मत मुक्ती संग्रामात सहभागी असलेले बांगलादेशच्या लष्करातील निवृत्त अधिकारी लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या द हिस्ट्री अनफोल्डिंग या विषयावरील ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल एस.एस. मेहता (निवृत्त) होते. बांगलादेशातील बीर उत्तम हा नागरी सन्मान मिळालेले शहाबुद्दीन अहमद आणि लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर हे ढाका येथून कार्यक्रमात सहभागी झाले होते.
बांगलादेशचे मुंबईतील उप-उच्चायुक्त मोहम्मद लुत्फोर रहमान तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज्चे (कॅस) संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे या वेळी उपस्थित होते.