मुंबई – पुण्यातील ससून रुग्णालयातून गेल्या 15 दिवसांपासून फरार असलेला ड्रगमाफिया ललित पाटील (Lalit Patil) याला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र त्यापूर्वी ललित पाटील याने माध्यमांना ‘मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नाही, मला पळवले गेलं. यात कोणाकोणाचा हात आहे, मी सगळ सांगणार,’ असा गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
ललित पाटील प्रकरणात सध्या दोन मंत्र्यांची नावे समोर येत आहेत. सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी “ललिल पाटील प्रकरणाचा तपास करायला हवा. या प्रकरणात राजकीय लोक आहेत. दादा भुसे, शंभुराज देसाई यांची नार्को टेस्ट करा,” अशी मागणी केली होती. यानंतर आता संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, “ललित पाटील हा एक फक्त मोहरा आहे आणि त्याचा वापर राज्याचे गृहमंत्री राजकारणासाठी करत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. उद्या नाशिक शहरामध्ये आमचा ड्रग्स विरुद्ध मोर्चा आहे. नाशिकसारखं शहर ड्रग्सच्या विळख्यात आहे. ड्रग्सचे दोन मोठे कारखाने नाशिक शहरामध्ये उध्वस्त करण्यात आले आहे.”
“महाराष्ट्रात ड्रग्स हे गुजरातमधून येतं”
“महाराष्ट्रात ड्रग्स हे गुजरातमधून येतं. हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे का? किमान दीड लाख कोटी रुपयांचं ड्रग्स गुजरातमध्ये जप्त करण्यात आलं आहे. हे ड्रग्स जप्त केलं नाही तर महाराष्ट्रात पाठवलं आहे. मुंबई आणि पुणे शहरातून आत्तापर्यंत साधारण 700 ते 800 कोटी ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलले पाहिजे. महाराष्ट्र बदनाम करायचा, तरुण पिढी उध्वस्त करण्याचे कारस्थान सध्या सुरू आहे.”
“गृहमंत्री पदाच्या प्रतिष्ठेला जसं शोभेल तसं त्यांनी वागायला हवं, ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. ललित पाटील प्रकरणामध्ये दोन मंत्र्यांचा समावेश आहे, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी करायला हवी. त्याचबरोबर हिमंत असेल तर त्यांनी त्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे. राजकारण हा सुडाचा कारखाना नाही. आम्ही आजपर्यंत कधीच सुडाचं राजकारण केलं नाही. या ड्रग्स प्रकरणाची सखोल चौकशी करून गृहमंत्र्यांनी या मागचं सत्य शोधून काढले पाहिजे.” यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल देखील केला.