Vijay Vadettiwar : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी परभणीत आयोजित एका सभेला संबोधित करताना एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी, “डॉ.आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर भारताचे दोन तुकडे झाले असते,” असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
परभणीत थायलंड येथील सहा फूट उंचीच्या ५० बुद्धरूप मूर्तींचे वितरण आणि वैश्विक धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विजय वडेट्टीवार बोलत होते.
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोक्यात मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा विचार आला असता, तर या भारताचे दोन तुकडे करावे लागले असते. आज वर दिल्लीत बसलेल्या लोकांनी हा विचार आपण केला पाहिजे.” असे त्यांनी म्हटले,
पुढे विजय वडेट्टीवार यांनी मंदिरातील पुजाऱ्यांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “मंदिरातील दानपेट्या काढून टाकल्या, तर मंदिरात एकही पुजारी दिसणार नाही.” असे म्हणत वडेट्टीवारांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. दरम्यान, वडेट्टीवारांच्या या विधानावर अद्याप सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया आली नाही.