मेलबर्न – आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद ( ICC Test Championship ) स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरी गाठणार का? या प्रश्नाबाबत सध्या तरी भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. इंग्लंडकडून पाकचा पराभव व ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण आफ्रिकेचा झालेला पराभव भारताच्या पथ्यावरच पडला आहे. त्यामुळे येत्या काळात भारतीय संघ खेळणार असलेल्या पाच कसोटीत किमान चार सामने जिंकले तरीही त्यांना अंतिम फेरी गाठणे सोपे ठरणार आहे.
भारतीय संघाने बांगलादेशचा पहिल्या कसोटीत 188 धावांनी मोठा पराभव करूनही संघाला जितका फायदा होणार नव्हता तितका ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण आफ्रिकेवरील विजयाने होणार आहे. यामुळे या स्पर्धेच्या क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आला आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला या पराभवामुळे तिसऱ्या स्थानावर जावे लागले आहे. 2021 साली भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. मात्र, त्यावेळी त्यांना न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
यावेळी मात्र भारतीय संघ सरस कामगिरी करत असून अंतिम फेरी गाठण्याची त्यांना जास्त संधी आहे. सध्याच्या क्रमवारीतून तरी तसेच दिसत आहे. भारताला आपले दुसरे स्थान कायम राखण्याची संधी असून बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका 2-0 अशी जिंकावी लागणार आहे. तसेच भारताचे स्थान कायम राहण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण आफ्रिकेचा मालिका पराभवही झाला पाहिजे.