नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत चीनच्या मुद्द्यावर चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप करताना चीनबाबत पंतप्रधानांनीच उत्तर दिले पाहिजे संरक्षण मंत्र्यांनी नाही अशी टीका आणि आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी संबंधित एका थिंक टॅंकला चीनी दूतावासाकडून पैसे मिळाले असल्याचा आरोपही कॉंग्रेसने केला आहे.
माउंटेन स्ट्राइक कॉर्प्सची पहिली डिव्हिजन प. बंगालमध्ये स्थापन करण्याचा निर्णय संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने घेतला होता. मात्र हा मुद्दा मोदी सरकारने शीतपेटीत का टाकला याचे उत्तरही सरकारने द्यावे अशी मागणी कॉंग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी केली. ते म्हणाले की चीनशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्याचे पंतप्रधान टाळतात.
या विषयावर त्यांना चर्चाच करायची नसते. पंतप्रधानांचे चीनशी घनिष्ठ संबंध आहेत कारण जेव्हा ते एका राज्याचे मुख्यमंत्री होते आणि चीनचे राष्ट्रपती एका प्रमुख पदावर होते तेव्हापासून त्यांचे निकटचे संबंध आहेत. माउंटेन स्ट्राइक कॉर्प्सची दुसरी डिव्हिजन पठाणकोट येथे केली जाणार होती. मात्र ती होऊ शकली नाही कारण चीनप्रेमी व्यक्ती देशात सत्तेवर आली.
राहुल गांधी यांनी चीनच्या संदर्भात आणि भारतीय सैनिकांच्या बाबत जी टीप्पणी केली त्यावर प्रश्न विचारल्यावर खेरा म्हणाले की, भारत सरकारने सैनिकांचे हात बांधून ठेवले आहेत. त्यावर राहुल यांनी प्रकाश टाकला आहे. वीर सैन्य मात्र राजा भित्रा अशी देशाची आज अवस्था झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी पूर्वी प्रशिक्षणासाठी चीनची यात्रा केली आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन या संघटनेशी जोडले गेले आहेत. त्यांचे चीनशी काय संबंध आहेत, असा सवाल खेरा यांनी विचारला. तसेच एस. जयशंकर यांचे पुत्र ज्या थिंक टॅंकचे नेतृत्व करतात त्यांना चीनच्या दूतावासाकडून तीन वेळा पैसे मिळाले आहेत असा आरोपही खेरा यांनी केला. राजीव गांधी फाउंडेशनला 1.35 कोटी रूपये चीनच्या दूतावासाकडून मिळाल्याचा दावा गेल्या आठवड्यात गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. त्याला खेरा यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.