मुंबई : देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध सर्वांना लागले आहेत. निवडणूक अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपली आहे. देशभरातले सर्वपक्षीय नेते निवडणुकीच्या कामासाठी कंबर कस्तान दिसत आहेत. युत्या-आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा देखील सुरू झल्या आहेत. महाराष्ट्रातही शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करून भाजपासमोर मोठं आव्हान निर्माण केले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये महाविकास आघाडीची पुढची दिशा, तिन्ही पक्षांच्या वज्रमूठ सभा आणि आगामी निवडणुकांबाबत चर्चा होत असल्याची माहिती मिळाली आहे. तिन्ही पक्षांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तिन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत १६-१६-१६ जागांच्या फॉर्म्युलावर निवडणूक लढतील अशी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील या बैठकीला होते.
त्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींनी आव्हाड यांना यासंबंधी प्रश्न विचारला. महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभेचा काय फॉर्म्युला ठरला आहे असा प्रश्न आव्हाड यांना विचारल्यावर आव्हाड म्हणाले, मला काहीच माहिती नाही. मी त्या बैठकीत आंधळा, मुका बहिरा होतो, असे त्यांनी यावेळी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याने त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.