मुंबई – हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस चांगलाच वादळी ठरला असून, यावेळी अनेक मोठ्या घडामोडी घडल्याचं दिसून आलं. विरोधकांनी एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची देखील कोंडी करण्यात आली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं आहे. दरम्यान, फडणवीसांनी एसआयटीची घोषणा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचं सीबीआयने म्हटलं होतं. त्यानंतरही फडणवीस यांनी हे प्रकरण एसआयटीकडे सोपवलं आहे. मात्र, आता फडणवीस यांच्या या घोषणेमुळे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची कोंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, काल (दि. 22) गुरुवारी भाजप नेते नितेश राणेंनी दिशा सालियन प्रकरण विधानसभेत आपलं मांडलं होतं. “कोणाच्या राजकीय राजकीय दबावामुळे दिशा सालियन प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला. तिच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं. 8 जूनच्या पार्टीत कोण कोण होतं? याची चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणी नितेश राणेंनी केली होती.
दरम्यान, नितेश राणेंच्या आरोपांना आता स्वतः आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी नितेश राणेंचा जोरदार समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. “दिशा सालियनचा मृत्यू झाला, त्यादिवशी माझ्या आजोबांचं (रश्मी ठाकरेंच्या वडिलांचं) निधन झालं होतं. त्यामुळे मी रुग्णालयात होतो. पण, सत्य आहे 32 वर्षांच्या तरुणाला हे सरकार घाबरलं आहे.” असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.