मुंबई – पंतप्राधन नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक घेतली. करोना महासाथीबाबतच्या या बैठकीमध्ये संबोधित करताना पंतप्रधानांनी इंधनावरील करांवरून महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले होते. केंद्र सरकारच्या सूचनांनंतरही राज्यांनी मूल्यवर्धित कर कमी केले नाहीत हा जनतेवर अन्याय असल्याचं मोदी यांनी म्हंटलं होत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर आकडेवारी मांडत मोदींचा इंधन करांबाबतीतील दावा खोडून काढला होता. अशातच आता ठाकरे यांनी मोदींनी केलेल्या दाव्याचा प्रतिवाद करण्यामागचे कारण सांगितले आहे.
एका वृत्तसंकेतस्थळाशी बोलताना ठाकरे यांनी, “मी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर दिलं कारण त्यांनी आधी अनपेक्षितरित्या महाराष्ट्राला उगाच बोल लावले. त्या बैठकीचा तो मुद्दा नव्हता, ती बैठक करोनाबाबत होती. साहजिकच मला खरी आकडेवारी देणं भाग होतं. माझ्या जनतेचा गैरसमज होता कामा नये हा माझा त्यामागचा उद्देश होता.” असं सांगितलं.
महाराष्ट्रामधे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस विरुद्ध भाजप असा राजकीय सामना पाहायला मिळतोय. अशातच आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलताना केंद्रातील भाजप सरकारला पुन्हा एकदा डिवचलं आहे.
मुख्यंमत्री म्हणाले, “खरंतर केंद्र सरकारने देशाच्या शत्रूसोबत लढलं पाहिजे. तुम्ही एका पक्षाचे पंतप्रधान नाही, तर देशाचे पंतप्रधान आहात. चीन एका बाजूने घुसलेला आहे हे नाकारता का? ते पाकिस्तानला दमदाट्या करतात, चीनला ७ वर्षात कधी दमदाटी केली का आपण? चीनला एक तरी दणका देऊ शकलो आहोत का? जसं पानावर तोंडी लावायला लोणचं असतं तसं काहीच नसलं की तुम्ही राजकारणाच्या पानावर पाकिस्तानला घेऊन बसता. मधून मधून पाकिस्तानचं चाटण चाटवलं की लोकं खूश.”