मुंबई : आमदार भास्कर जाधव यांचे काय सांगू? ते बारामतीमधून देखील निवडणूक लढवतील. मी राज्याचा नेता आहे. इतक्या खालच्या पातळीवर मी लक्ष देत नाही. भाषण काय मीही करतो, त्यामुळे बोलायला काय जाते? प्रत्यक्षात जनता ठरवते, कोणाला विजयी करायचे ते. लोकशाहीत ज्यांच्या नशिबात असते तोच विजयी होतो, अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या भाषणाचा समाचार घेतला.
चिपळूणमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘आता अजित पवार राष्ट्रवादी गट सत्तेत सहभागी झाला आहे. आमच्याबरोबर भाजप, राष्ट्रवादी गट, आरपीआय आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जागा वाटपाबाबत आमचे तीन नेते एकत्र बसतील व निर्णय घेतील. तो सर्वांना मान्य असेल. आमच्या नेत्यांना महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीची माहिती आहे. त्या त्या ठिकाणची ताकद आणि स्थिती याची नेत्यांना पूर्ण कल्पना आहे.’
आमदार जाधव यांच्या वक्तव्यांवर, ‘ते कुठून निवडणूक लढवतील हे तेच ठरवतील. आपल्याला त्यात स्वारस्य नाही. मी राज्याचा नेता आहे. इतक्या खालच्या पातळीवर मी लक्ष देत नाही. आमदार जाधवांनी बारामती, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी कोठूनही निवडणूक लढवावी, त्यांचा तो अधिकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत पालकमंत्री सामंत म्हणाले, किरण सामंत हे आपले मोठे बंधू आहेत. त्यामुळे त्यांनी कोणता राजकीय निर्णय घ्यावा, हा त्यांचा निर्णय आहे. जर त्यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आणि उमेदवारी मिळाली तर शिवसेना पक्ष म्हणून त्यांना साडेतीन लाखाच्या मताधिक्क्याने विजयी करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.