कोल्हापूर – “आमच्यावर दबाव होता तो काम करण्यासाठी होता, आमदारांना निधी देण्यासाठी दबाव होता, राज्याच्या कामासाठी दबाव होता. मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, आम्ही देखील मराठ्याची औलाद आहे.
भाषण करून कामं होत नाही त्यासाठी ठोस भूमिका घ्यावी लागते,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात उत्तर सभेत केले. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी सत्तेची गरज सांगितली त्याच मार्गाने मी गेलो, असेही पवार यावेळी म्हणाले.
राज्याचा विकास कसा होईल त्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सत्तेत गेला नाही, लोकांच्या कामासाठी आमच्यावर दबाव होता. काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरात बसता येत नाही.
आमच्याबद्दल चुकीचा मेसेज पसरवला जात आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पडत होते त्यावेळी सत्तेत सहभागी होण्याबाबत 52 आमदारांच्या सहीच पत्र दिले होते. हे जर खर नसेल तर मी राजकारणातून निवृत्त होईल. खर असेल तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हाल का? अशी विचारणाही पवारांनी यावेळी केली.
पवार पुढे म्हणाले की, कोल्हापुरात होणारी उत्तरदायित्व सभा माझ्यासाठी महत्वाची आहे. कोल्हापूर हे पुरोगामी चळवळीचे केंद्र कायम राहिले आहे, बळीराजावरचे दुष्काळाचे सावट दूर करावे हे अंबाबाई चरणी प्रार्थना करतो.
महाराष्ट्रातील अनेक भागात अजून म्हणावा तसा पाऊस नाही. कोल्हापूरतील सलोखा कुणी बिघडवत असेल तर सत्तेत असताना देखील आम्ही त्याला विरोध करु.
जो गरीब त्याला आरक्षण मिळायला हवं
जो गरीब आहे त्याला आरक्षण मिळाले पाहिजे. उपोषणाला बसले आहेत त्यांना आम्ही समजावून सांगत आहोत पण ते ऐकत नाहीत. काही ओबीसी देखील आमच्यावर अन्याय नको असे म्हणत आहेत.
उद्या या प्रश्नी सह्याद्रीवर सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक बोलवली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच सध्या होत असलेल्या जी-20 मुळे जगात भारताचे नाव उंचावल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले.