जालना – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. दरम्यान आजपासून जरांगे यांनी उपचार आणि पाणी घेण्यास नकार दिला असून, आमरण उपोषण सुरु केले आहे. तसेच, सरकार वेळोवेळी वेळ मागून घेत आहे. त्यामुळे महिना नाही आणखी दोन महिन्या घ्या, पण आरक्षण द्या असे जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावरुन आता मनोज जरांगे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे म्हणाले, आता पुढील दिशा म्हणजेच आमरण उपोषण सुरु केले आहे. सरकारला कालपर्यंत दिलेला वेळ आता संपला आहे. याचा अर्थ असा नाही की, सरकारने प्रयत्न केले नाही. त्यांनी प्रयत्न केले, पण त्यांनी काढलेल्या जीआरमध्ये चुका झाल्या. त्यामुळे यात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे नक्कीच बदल करतील. मात्र, त्यांना मी शब्द दिला होता की, चार दिवस पाणी आणि उपचार घेईन. मी माझ्या शब्दावर पक्का असून, आता चार दिवस झाले आहेत. त्यामुळे आजपासून पाणी आणि उपचार घेण्याचे बंद केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार एक महिन्याचा वेळ मागत आहे. त्यांना वेळ देण्यासाठी आमची काहीही हरकत नाही. मात्र तोपर्यंत माझ उपोषण सुरुच राहणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक महिन्याने किंवा दोन महिन्यांनी निर्णय घेऊदे, आमची काही हरकत नाही.
पण जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय येत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी आमच्या काही लोकांची आज बैठक होणार आहे, अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली.