सत्यशोधन पथकाकडे जबाबदारी
नवी दिल्ली -राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने दिल्ली हिंसाचाराची गंभीर दखल घेतली आहे. त्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी आयोगाने सत्यशोधन पथक स्थापन केले आहे.
मागील रविवारपासून सलग तीन दिवस ईशान्य दिल्ली हिंसाचारामुळे धुमसली. त्या हिंसाचारात 42 जण मृत्युमुखी पडले. तर सुमारे 250 जण जखमी झाले. मागील तीन दशकांतील दिल्लीतील भयंकर हिंसाचार म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. आता ईशान्य दिल्लीतील हिंसक घटनांची चौकशी करण्यासाठी मानवी हक्क आयोग सरसावला आहे. हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे शुक्रवारपासून दिसून येत आहे. पोलीस आणि सुरक्षा जवानांच्या तैनातीमुळे तेथील अनेक दुकाने उघडली जात आहेत. स्थानिक रहिवासीही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घरांबाहेर पडू लागले आहेत. त्याशिवाय, रस्त्यांवरील वाहनांची वर्दळही वाढल्याचे चित्र आहे.
मात्र, ईशान्य दिल्लीतील शाळा अजून आठवडाभर बंद राहणार आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तेथील शाळा मंगळवारपासून बंद ठेवण्यात आल्या. त्या शाळा 7 मार्चपर्यंत सुरू होणार नसल्याचे शनिवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. शाळांच्या वार्षिक परीक्षा पुढे ढकलण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.