पोलिसांचा तपास एकतर्फी असल्याचा आरोप
नवी दिल्ली – हिंसाचारग्रस्त दिल्लीतील स्थिती अद्याप सामान्य झालेली नाही. दिल्लीत अजूनही भीतीचे वातावरण आहे, असा दावा करतानाच कॉंग्रेसने दिल्ली पोलिसांकडून हिंसाचार प्रकरणी एकतर्फी तपास सुरू असल्याचा आरोप केला.
कॉंग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिल्ली पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिल्ली तीन-चार दिवस पेटू देणाऱ्या पोलिसांकडून कारवाईच्या नावाखाली कुणाविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत याची छाननी व्हायला हवी. निदर्शक आणि कार्यकर्त्यांनाच लक्ष्य केले जात आहे. तशा प्रकरणांच्या छाननीसाठी सर्वोच्च न्यायालयाने न्यायमित्राची नियुक्ती करावी, अशी विनंती शर्मा यांनी केली.
द्वेषयुक्त वक्तव्याची व्याख्या काय? पोलिसांनी नोंदवलेले गुन्हे पाहता भाजप नेत्यांची वक्तव्ये द्वेषयुक्त ठरत नाहीत. मात्र, नागरिकांकडून होणारी निदर्शने, आंदोलने समाजासाठी धोका ठरतात, असा शाब्दिक टोमणा त्यांनी लगावला. केंद्र सरकार किंवा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडून कुठल्या अपेक्षा केल्या जाऊ शकत नाहीत. मात्र, न्यायालयांकडून आम्हाला आशा आहे. संपूर्ण जगाचे भारताकडे लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी भूमिका शर्मा यांनी मांडली.