मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ः घरे विकू नका मुंबईचा हक्क गमावू नका
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचे मोठे योगदान आहे. या प्रत्येक गिरणी कामगारास घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असून एकही गिरणी कामगार बेघर राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
गिरणी कामगारांनी त्यांना मिळालेली घरे इतरांना विकू नयेत आणि मुंबई बाहेर जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. म्हाडाच्या विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार व त्याच्या वारसांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागातील बॉम्बे डाईंग, स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या 3 हजार 894 सदनिकांची सोडत आज वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, महापौर किशोरी पेडणेकर, सभापती विनोद घोसाळकर, झोपडपट्टी पुनर्वसनचे सभापती विजय नाहटा, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, मी आज भाषण न करता कुटुंबातील प्रमुख म्हणून तुमच्याशी संवाद साधणार आहे. गिरणी कामगारांचे ऋण माझ्यावर आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी आलो आहे. घर मिळाल्यावर मला आपल्या घरी चहा प्यायला बोलवा, आपल्या घरात आनंदी राहा, घरे विकू नका मुंबईचा हक्क गमावू नका, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जास्तीत जास्त परवडणारी घरे देणार- डॉ. आव्हाड
मुंबई पालिका क्षेत्रातील बंद पडलेल्या गिरण्यामधील गिरणी कामगारांना घरे देण्याचा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. येत्या काळात जास्तीत जास्त परवडणारी घरे मुंबईत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. कोणीही घरापासून वंचित राहणार नाही.
झोपडपट्टीवासीय, गिरणी कामगार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. पुढील काळात पोलीस, शासकीय चतुर्थ कर्मचारी यांच्यासाठी प्रत्येकी 10 टक्के घरांचा समावेश असेल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.