आंबेगाव तालुका वार्तापत्र : संतोष वळसे पाटील
मंचर – परिसरात पुणे-नाशिक हमरस्त्यावर वाहतुकीच्या समस्येने प्रवाशांसह ग्रामस्थ हैराण झाले आहेत. बायपासची कामे ठप्प असून कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बायपास रस्त्याची कामे सुरु झाल्यानंतर तब्बल एक वर्ष पूर्ण होण्यासाठी लागतील. तोपर्यंत वाहतुककोंडीची समस्या सहन करायची का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
पुणे-नाशिक हमरस्त्यावर महत्वाचे शहर म्हणून मंचर शहर ओळखले जाते. मंचर येथील हमरस्त्यावर पिंपळगाव फाटा चौक, बाजार समितीचे प्रवेशद्वार, मंचर बसस्थानक, गेटवेल हॉस्पिटल समोर इत्यादी ठिकाणी नेहमीच रस्ता जाम होत आहे. वाहतूक कोंडीमुळे नको रे बाबा प्रवास म्हणण्याची वेळ प्रवासी बांधवांवर आली आहे. वाहतूक कोंडी दूर व्हावी, म्हणून गायमुख येथून बायपास सुरू होऊन निघोटवाडी फाट्याच्या अलीकडून पुन्हा मूळ रस्त्यास मिळणार आहे.
त्यादृष्टीने भूसंपादन करण्याची कामे अंतिम टप्प्यात आहे; परंतु बायपास रस्त्याचे काम सुरू झाले नाही. पाच वर्षापासून बायपासचे काम ठप्प आहे. त्यामुळे बायपास रस्त्यांच्या कामांना मुहूर्त कधी मिळणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे निवडून येऊन सहा महिने झाले; परंतु मंचर बायपास रस्त्यास चालना देण्यासाठी अद्याप कोणतीही हालचाल झाली नसल्याचे प्रत्यक्ष ठप्प असलेल्या कामांवरुन दिसते. सद्यस्थितीत दररोज वाहतुककोंडी होत आहे.