कोण आपला आणि कोण विरोधक याच विचारांनी ग्रासले
जनआंदोलनेही रद्द करण्याची वेळ
आंदोलनांसाठी नेतृत्त्व नसल्याने नियोजन कोलमडले
– महादेव जाधव
फुरसुंगी – राज्यातील आघाड्या-बिघाड्यांचा मोठा फटका आता नागरिकांच्या जीवन-मरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनावर झाला आहे. कारण सासवड मार्गाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे नुकत्याच झालेल्या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, याच्या निषेधार्थ सासवड मार्गावर भेकराईनगर चौकात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीने शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, सकाळी आठ वाजता राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडताच नियोजित आंदोलनही रद्द करण्यात आले. यातून या राजकारण्यांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वतःचाच स्वार्थ दिसून आला.
हडपसर-सासवड या पालखी मार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून कमालीची दुरवस्था होऊन रुंदीकरण व चौपदरीकरणाचे काम रखडल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच दिवेघाटात जेसीबी वारकऱ्यांच्या दिंडीत घुसल्याने दोन वारकऱ्यांचा मुत्यू झाला तर, 20-25 वारकरी जखमी झाले होते. एवढे होवूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग येत नसल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्त्वाखाली भेकराईनगर येथे सासवड मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते.
मात्र, राज्यात सत्तास्थापनेच्या रातोरात हालचाली होवून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर, अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सासवड मार्गासाठीचे नियोजित आंदोलनही रद्द करण्यात आले. कारण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत गेल्याने कॉंग्रेसने आता राष्ट्रवादीबरोबर आंदोलन कसे करायचे हाच प्रश्न दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पडला होता. त्यातूनच दोन्ही पक्षाचे नेतृत्त्व करणारे नेते मुंबईला रवाना झाल्याने या आंदोलनाचे नेतृत्त्व करणार तरी कोण? असा सवाल नागरिकांना पडला होता. यातूनच हे आंदोलन न करता पुढे ढकलणेच उचीत ठरेल, असा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आणि आंदोलन रद्द केले.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सत्तास्थापनेचे घोंगडे भीजत पडले होते. आघाड्या, युत्या,बिघाड्या, भाजप-सेना युती, महाविकास आघाडी, महाशिवआघाडी अशा आघाड्या-युत्यांची चर्चा सुरू असतानाच भाजप व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मिळून राज्यात रातोरात सत्तास्थापन करून सर्वांनाच मोठा धक्का दिला. या धक्क्यातून सामान्यांबरोबरच सर्वच पक्षांचे कार्यकर्ते सावरत नसल्याने नियोजित आंदोलन रद्द झाले. मात्र, यातून जनता मात्र रोजच जीवन-मरणाच्या दोरीवरून म्हणजे सासवड मार्गावरून प्रवास करत आहेत. याला वाली कोण आहे की नाही, पक्षीय स्वार्थासाठी जनतेचे प्रश्न रखडले जात आहेत. हे यातून दिसून येते. त्यामुळे आगामी काळात कोणत्याही राजकीय पक्षावर जनतेने विश्वास न ठेवता स्वतःच्या न्याय-हक्कासाठी स्वतःच रस्त्यावर उतरून झगडावे लागेल. हे आता सिद्ध झाले आहे. कारण, राजकारणाची पातळी खूपच घसरत चालली आहे. त्यामुळे आगामी काळात जनता कोणावरच विश्वास ठेवणार नाही.