समलखा (हरियाणा) – देशात सामाजिक सौहार्दाचे वातावरण कसे टिकवायचे यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिंतन करणार आहे. रविवापासून येथे संघाचे तीन दिवसांचे वार्षिक शिबीर होणार असून त्यात प्रामुख्याने या विषयावर चर्चा होणार आहे. तसेच लोकांना त्यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी कसे बनवायचे यावरही विचारमंथन करणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला त्याचे प्रमुख मोहन भागवत आणि सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांच्यासह 1,400 हून अधिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे संघाचे नेते सुनील आंबेकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजपकडून अध्यक्ष जेपी नड्डा आणि सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष या बैठकीला उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले. संघाशी संबंधित विविध संघटनांचे काही निवडक पदाधिकारीही यात सहभागी होणार आहेत. प्रतिनिधी सभा ही संघाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे.
आंबेकर म्हणाले, संघाची शाखा ही खरे तर समाजात बदल घडवून आणणारी केंद्रे आहेत. स्वयंसेवकांनी केलेल्या समाजाच्या अभ्यासावर आधारित ते आपापल्या कार्यक्षेत्रात त्यासाठी काम करतात. हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील समलखा येथे आयोजित या तीन दिवसीय बैठकीत गेल्या काही वर्षांत स्वयंसेवकांनी केलेल्या अभ्यासावर आणि अशा अभ्यासाच्या आधारे केलेल्या कामांवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत विविध सामाजिक-आर्थिक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. विशेषत: सामाजिक सौहार्दाचे वातावरण कसे निर्माण करावे यावरही विचार केला जाईल, अशी माहिती आंबेकर यांनी दिली. तसेच शाखांच्या कामकाजाचा आढावा घेऊन भविष्यातील रोड मॅप तयार केला जाईल, असे ते म्हणाले.