मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तडकाफडकी बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपानंतर भाजप आक्रमक झालं आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
“बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?”, असा शेर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून शेअर केला. यामधून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं असून मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी आणखी किती बळी जाणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी,
बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?#SachinWaze #SachinVaze #Target100Cr— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 20, 2021
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये वसूल करण्यास सांगितले होते असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. टाईम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये जमा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे.