मुंबई : राज्यातील करोना बाधितांच्या संख्येत रोज वाढ होताना दिसत आहे. राज्यात आता ६ नवे करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना बाधितांची संख्या १५९ वर गेली आहे. आता येत्या काही दिवसांत कोरोनाची बाधितांची संख्या गुणाकार करू लागेल आहे.
याच पार्श्वभूमीवर मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,’आपल्याला काही होणार नाही असं समजून बाहेर पडू नका. पोलीस देखील एक माणूसच आहे. त्यांच्यावर किती ताण द्यायचा. घराबाहेर पडणाऱ्या किती लोकांना पोलीस थांबवणार? आपण स्वत: शिस्त पाळून सरकारला सहकार्य करावं, अशी विनंती त्यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले,’कृपया या दिवसांमध्ये कोणीही घराबाहेर पडू नये. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधीही बाहेर पडतो त्याच्यासोबत अनेक लोक बाहेर फिरतात. त्यांच्यासोबत असलेल्यांपैकी कोण पॉझिटिव्ह आहे हे सांगता येणार नाही. त्यामुळे आपणच खबरदारी घ्यायला हवी आणि घरातच थांबायला हवं असा सल्ला पाटील यांनी दिला.