– सुहास यादव
गुंतवणूक म्हटले की कुठल्याही वयोगटातील सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात येणारे प्रश्न म्हणजे, गुंतवणूक का करावी, गुंतवणुकीचे नियोजन हे काय असते, महिन्याच्या एक तारखेला माझ्या बॅंक खात्यामध्ये पगार जमा होतोय ना मग आत्ताच कशाला चिंता करायची? इथे गुंतवणूक करायला पैसे आहेत कुणाकडे असा प्रश्न बहुतांश तरुण वर्गाला पडतो. तरुण वयात मौजमजा करायाची नाही तर मग केव्हा करायची? आपल्याला नाही जमत बुवा सारखं सारखं उद्याचा विचार करायला आणि सतत काटकसर करायला…. तुमची देखील अशीच भूमिका असेल आणि बघू पुढचे पुढे असा जर विचार करत असाल तर खडबडून जागे होण्याची हीच योग्य वेळ आहे.
आर्थिक उद्दिष्टे
बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्ही पैसे कमावत असाल किंवा नसाल, पैशांची गरज मात्र प्रत्येक टप्प्यावर लागतेच. आर्थिक नियोजन हे अत्यंत मह्त्त्वाचे आहे. नुकतेच लग्न झालेल्या जोडप्यांना सुद्धा जरी तीन चार वर्षांनी येणाऱ्या मुलांचे नियोजन करायचे असेल तरी लग्न झाल्या दिवसापासून मुलाच्या जन्माच्या आधीचे खर्च ( प्रसूतीपूर्व उपचाराचे खर्च) प्रसूतीचा खर्च, नंतर बाळाच्या तपासण्या, लसीकरण, मुले थोडी मोठी झाल्यावर पाळणाघराचा खर्च, शाळा असा अनेक प्रकारच्या खर्चाचे नियोजन सुरवातीपासून करावे लागते. असा विचार करणे म्हणजे गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठरवणे. नोकरी-संसार करत असताना एकाचवेळी अनेक आर्थिक उद्दीष्टांचा विचार आणि त्या दृष्टीने गुंतवणूक करणे ही आवश्यक गरज असते.
आर्थिक ध्येय ठरवा
समजा आज श्री. करमरकर यांचे वय 30 आहे. ते विवाहित आहेत. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे, पत्नी व आईवडिलांची जबाबदारी आहे. करमरकरांचा मासिक पगार रुपये 50 हजार आहे. या उदाहरणात सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूक केव्हा सुरू करावी यासाठी कशाचीही वाट न पाहता त्वरित गुंतवणूक सुरू करावी यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही.
करमरकरांना मुलीच्या शिक्षणासाठी, आईवडिलांच्या औषधेपचारासाठी, स्वतःच्या आणि पत्नीच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन करणे व त्याप्रमाणे आवश्यक गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
गुंतवणुकीचे नियोजन करताना आयुष्यातील आर्थिक भवितव्याचा आराखडा मांडावा. त्यासाठीचे काही मुद्दे –
- नोकरीची किती वर्षे शिल्लक आहेत
- मासिक घरखर्च किती आहे.
- येणाऱ्या काळात मुलाच्या शिक्षणासाठी किती पैसा लागेल.
- आईवडिलांसाठी वयानुसार वैद्यकीय खर्चाची सोय काय
- नवीन घरासाठी पैशाची जमवाजमव
- प्राप्तिकर वाचवणाऱ्या गुंतवणुकीचे नियोजन
- स्वतःचा व संपूर्ण कुटुंबाचा आरोग्य विमा व आयुर्विमा यांचे योग्य नियोजन
- निवृत्तीच्या वेळी आवश्यक असणाऱ्या पैशांचे सुनियोजित नियोजन
अशा अनेक उद्दिष्टांतून वेगवेगळ्या प्राधान्यक्रम यादी तयार करणे आवश्यक असते. नजिकच्या काळातील उद्दिष्टे ( एक ते तीन वर्षातील), मध्यम कालीन उद्दिष्टे (चार ते सात वर्षातील) आणि दीर्घकालीन उद्दिष्टे (आठ वर्षापासून पुढील काळातील). या उद्दिष्टांचा क्रम समजल्यास नियोजन करणे सोपे होते.
ही सर्व उद्दिष्टे म्हणजे आपल्या आयुष्यातील कौटुंबिक जबाबदाऱ्यांची जाणीव असते. त्या जबाबदाऱ्या पार पाडता याव्यात यासाठी लागणारे आर्थिक बळ उभे करण्यासाठीची गुंतवणूक आणि त्या गुंतवणुकीचे वेळापत्रक तयार करणे गरजेचे असते. यासाठी आर्थिक सल्लागाराचा सर्वंकष सल्ला घेणे महत्त्वपूर्ण ठरते.
बचत आणि गुंतवणूक हे जरी सारखे वाटणारे शब्द असले तरी प्रत्यक्षात दोघांमध्ये खूप अंतर आहे. बॅंकेत बचत खात्यात पैसे साठवणे, रिकरिंग काढणे ही झाली बचत. परंतु त्या बचतीचा वापर नवीन फोन घेण्यासाठी किंवा गाडी घेण्यासाठी केल्यास बचतीचे रुपांतर गुंतवणुकीत न होता खर्चामध्ये होते.
गुंतवणूक म्हणजे काय तर आपण ज्या पर्यायांमध्ये पैसा गुंतवला आहे तिथे पैशापासून आणखी पैशाची निर्मिती होत राहिली पाहिजे. पैशाला पैसा लागला पाहिजे. बचतीचे गुंतवणुकीत परिवर्तन होताना उत्तम परतावा हा महत्त्वाचा भाग आहे.
अर्थात त्यासाठी गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी करण्याचा संयम बाळगावा लागतो. तुम्ही साठवलेल्या बचतीचे रुपांतर गुंतवणुकीत कसे करायचे याचा निर्णय घेताना आर्थिक सल्लागाराची भूमिका महत्त्वाची ठरते.
आर्थिक नियोजन आणि मानसिकता
असे पाहण्यात येते की, 90 टक्के भारतीय निवृत्ती जीवन आपल्या मुलांवर अवलंबून राहतात. फक्त 10 टक्के लोक निवृत्ती जीवनसाठी पैशांचे नियोजन करतात. 10 टक्क्यांपैकी 70 टक्के निवृत्तीसाठी विम्याची निवड करतात. ज्याचा परतावा चार ते पाच टक्क्यांपेक्षाही कमी असतो.
आयुष्यात रितसर आर्थिक नियोजन करणाऱ्यांचे प्रमाण फक्त 0.0042 टक्के इतके कमी आहे.
भारतात फक्त 5 टक्के लोकांनी आरोग्य विमा घेतलेला आहे. म्युच्युअल फंडाच्या उत्तम परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये 4 टक्के भारतीय गुंतवणूक करतात.
आर्थिक सल्लागाराची महत्त्वाची भूमिका
एकदा का आपण अल्पकालीन, मध्यम, आणि दीर्घकालीन उद्दिष्टे ठरवली की पुढील टप्पा म्हणजे गुंतवणुकीचे योग्य पर्याय शोधणे. या महत्त्वाच्या टप्प्यावर तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराची मदत घेणे उपयुक्त ठरते. वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांची इत्यंभूत माहिती असलेला सल्लागार हा आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य गुंतवणूक करायला मदत करतो आणि आपले आर्थिक भविष्य सुनिश्चित करतो.