नवी दिल्ली – चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली कशी आणि तेथील संघर्षात 20 भारतीय जवान का शहीद झाले याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला दिली पाहीजे अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. एका व्हिडीओ संदेशात ही मागणी करताना त्यांनी म्हटले आहे की कॉंग्रेस पक्ष या घडीला सरकार आणि लष्कराबरोबर आहे. या आव्हानाच्या घडीला संपुर्ण देश एकत्रितपणे देशाच्या शत्रुचा मुकाबला करील असा विश्वासही सोनियांनी व्यक्त केला आहे.
तथापी या संकटाच्या स्थितीच्या संबंधात पंतप्रधानांनी पुढे येऊन देशाला विश्वासात घेतले पाहिजे आणि सीमेवरील स्थितीच्या संबंधात त्यानी सत्य कथन केले पाहिजे. काही भारतीय जवान अजून बेपत्ता आहेत असे सांगितले जात आहे, हे खरे आहे काय आणि नेमके किती जवान जखमी झाले आहेत ही माहितीही सरकारने दिली पाहिजे, लडाख मधील स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सरकारचे नेमके काय धोरण आहे हेही त्यांनी जाहीर केले पाहिजे अशी मागणी सोनिया गांधी यांनी या संदेशात केली आहे.
चीनने केलेल्या घुसखोरी विषयी देशात प्रचंड संताप आहे. त्यामुळे चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी कशी केली आणि आपले जवान तेथे शहीद होण्याची वेळ कशी आली या विषयी लोकांना जाणून घ्यायचे आहे. आज तेथील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील स्थिती काय आहे अशी विचारणाही सोनियांनी पंतप्रधान मोदींना केली आहे. कालच्या संघर्षात शहीद झालेल्या जवानांना त्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.