नवी दिल्ली: गलवान खोऱ्यात चीनबरोबर झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराची जी जीवित हानी झाली ती वेदनादायी आहे अशी भावना संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केली आहे. यात देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या शहीद जवानांना त्यांनी श्रद्धाजंलीही अर्पण केली आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी ही भावना व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतीय जवानांनी चीन सीमेवर अत्यंत शौर्य दाखवले. त्यांनी भारतीय लष्कराच्या उज्जवल परंपरेला साजेशी कामगीरी करताना आपल्या प्राणाचीही बाजी लावली आहे. त्यांनी दिलेले बलिदान देश कदापिही विसरणार नाही.
शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या प्रती मी पुर्ण सहानुभूती व्यक्त करतो. या कठीण परिस्थितीच्या काळात देश या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. आपल्या शूर सैनिकांविषयी आम्हाला अभिमान आहे असेही राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.