मुंबई- भारत-चीन सरहद्दीवर तणाव निर्माण झाल्यामुळे शेअरबाजारातील गुंतवणूकदार सावध झाले आहेत. यामुळे निर्देशांक फार मोठ्या प्रमाणात कोसळले नसले तरी गुंतवणूकदार विक्रीच्या मनःस्थितीत असल्याचे दिसून आले.
बुधवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 97 अंकांनी कमी होऊन ते 30,507 अंकांवर बंद झाला. आज सेन्सेक्समध्ये 600 अंकांचा चढउतार झाले. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.33 टक्क्यांनी म्हणजे 32 अंकांनी कमी होऊन 9,881 अंकांवर बंद झाला.
कोटक बॅंक, आयटीसी, पावरग्रीड, महिंद्रा, एचडीएफसी, एशियन पेंट्स या कंपन्यांचे शेअर आज पिछाडीवर होते. मात्र, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, ऍक्सिस बॅंक, इंडसइंड बॅंक, बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर वधारले. लॉकडाऊनमुळे शेअरबाजारात अगोदरच विक्रीचे वातावरण असताना चीनबरोबर संघर्ष वाढल्यामुळे गुंतवणूकदार सावध असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.
सध्याच्या परिस्थितीमुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार विक्री करीत असल्याचे चित्र बाजारात आहे. मंगळवारी या गुंतवणूकदारांनी 1,478 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. युरोप, अमेरिका आणि इतर देशांतील शेअरबाजार निर्देशांक मात्र आज वाढले. क्रुडचे दर 0.2 टक्क्यांनी कमी होऊन 40.62 डॉलर प्रति पिंप झाले. रुपयाच्या मूल्यात चार पैशाची सुधारणा होऊन रुपयाचे मूल्य 76.16 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले.