सध्या विविधस्तरावर रंगतायेत चर्चा
अनेक सवयींना मुरड घालावी लागेल तर, काही नव्याने लावून घ्याव्या लागतील
समाज शास्त्रातील अभ्यासकांकडून व्यक्त केले जातेय मत
पुणे – करोनानंतर शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल होताना दिसून येण्याची शक्यता आहे. या सामाजिक बदलातून काही ठिकाणी तीव्र संघर्ष होण्याचीसुद्धा शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना आपल्या अनेक सवयींना मुरड घालावी लागेल किंवा काही सवयी नव्याने लावून घ्याव्या लागतील, असे मत समाज शास्त्रातील अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
“करोनानंतरचे जग कसे असेल’ या विषयावर सध्या विविधस्तरावर चर्चा सुरू आहे. विशेष करून आर्थिक क्षेत्रावर या बदलाचा जास्त फोकस असला तरी सामाजिक बदलांकडेसुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. त्यांच्यामते सामाजिक बदलांवर आर्थिक परिणाम अवलंबून असतात.
सध्या सगळीकडे करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. त्याचबरोबर घराबाहेर पडायचे असले तर काही मूलभूत गोष्टी आपल्याला पाळाव्या लागत आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, कोणाशीही हस्तांदोलन न करता सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांचा समावेश आहे. करोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावरसुद्धा पुढील काही महिने आपल्याला या गोष्टींचे पालन करावे लागणार आहे. हा एक मोठा बदल स्वीकारावा लागणार आहे.
शहरी जीवनावर मर्यादा
शहरांची निर्मिती ही स्थलांतरातून झालेली असते.रोजगार उपलब्ध होतात म्हणून ग्रामीण भागातील नागरिक शहराकडे धाव घेतात. त्यामुळे आज शहरे झपाट्याने वाढली आहेत. झोपडपट्ट्यांची संख्या गेल्या 10 वर्षांत तिप्पटीने वाढली आहे. रोजगारासाठी आलेले हे स्थलांतरित आता पुन्हा गावाकडे जाण्यास तयार होत आहे. शहरात राहून आपला जीव धोक्यात घालण्यापेक्षा गावाकडे जी काय मीठ-भाकरी मिळेल त्यावर आपली गुजराण करू, अशी त्यांची मानसिकता होत आहे. पुणे शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमधील घरांना सध्या कुलूप लागत आहे. आता ग्रामीण भागात गेलेला हा कामगार किंवा मजूर पुन्हा लगेच शहरात येईल, असे वाटत नाही. गावाजवळच एखादा रोजगार मिळतो काय? याचा प्रथम विचार करेल. त्यामुळे आता शहरापेक्षा ग्रामीण भागाकडे जाण्याचा ओढा जास्त वाढेल. त्यामुळे शहरी जीवनावर मर्यादा येतील.
शुल्लक कारणावरून वाद टोकाला जाण्याची शक्यता
करोनाची दहशत ही करोना गेल्यानंतरही पुढील वर्षभर राहणार आहे. काही नागरिकांनी करोनाचा मोठा धसका घेतला आहे तर, काही बेफीकीर आहेत. त्यामुळे करोनानंतर या दोन्ही वर्गामध्ये संघर्ष होण्याची शक्यता अधिक आहे, असे मत सामाजिक शास्त्राचे अभ्यासक आणि ऍड. महेश गजेंद्रगडकर यांनी व्यक्त केले. अगदी शुल्लक कारणावरून म्हणजे “तु मास्क का नाही लावला’ यावरूनसुद्धा भांडणे होऊ शकतात. ही भांडणे किती टोकाला जातील याचा अंदाज येऊ शकत नाही.कामगारांचे स्थलांतर होणार म्हणजे शहरातील उद्योगांना कामगार मिळणार नाहीत. पुन्हा उद्योग सुरू करायचे झाले तर कामगार आणायचे कोठून हा मोठा प्रश्न असणार आहे. एकंदरीत प्रत्येक नागरिक हा स्वत:ची आणि कुटुंबाची जास्त खबरदारी घेण्याकडे लक्ष देईल. त्यामुळे साहजिकच त्याचे परिणाम हे अर्थकारणावर सुद्धा होणार आहेत, असे ही त्यांनी स्पष्ट केले.-