प्रसिद्ध बालकलाकार तरुणी सचदेव हिचा आज स्मृतिदिन. जाहिरातींमध्ये “आय लव यू रसना’ असे एका बाजूला मान करीत असे काही म्हणायची की “रसना गर्ल’ म्हणूनच ओळखली जाऊ लागली. 14 मे 1998 रोजी मुंबई येथे तिचा जन्म झाला व 14 मे 2012 रोजी तिचा नेपाळमधील विमान अपघातात मृत्यू झाला. विमानात तिच्या आई गीता यांचेही निधन झाले.
मुंबईतील उद्योगपती हरेश सचदेव आणि गीता हे तरुणीचे आईवडील. तिचा जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी आणि तोही वयाच्या चौदाव्या वर्षी झाला.त्यावेळी तिचे सर्व चाहते हळहळले होते. विधात्याच्या या कृतीस काय म्हणावे ते कळत नाही. तिचे शालेय शिक्षण मुंबईच्या वांद्रे येथील “बाई अवाबाई फ्रमजी पेटिट गर्ल्स’ हायस्कूलमध्ये झाले. तरुणीची आई मुंबईतील इस्कॉनच्या राधा गोपीनाथ मंदिरात भक्तमंडळीतील सदस्य होती त्यामुळे तरुणी हिने मंदिरातील उत्सवात नाटकांमध्येही काम केले होते. बोलके डोळे आणि निष्पाप चेहरा यामुळे ती जाहिरातींमध्ये खूपच लोकप्रिय झाली होती. एक हिंदी, दोन मल्याळम आणि एका तमिळी चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिने अभिनय केला होता.
तरुणीने रसना, कॉफी बाइट, कोलगेट, रिलायन्स मोबाइल, आयसीआयसीआय बॅंक, एलजी, गोल्ड विनर आणि शक्ती मसाला यासारख्या 50च्या वर उत्पादनांच्या दूरदर्शन जाहिरातींमध्ये काम केले. तिने वर्ष 2009 मधील अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन यांच्याबरोबर “पा’ या हिंदी चित्रपटात भूमिका केली आहे. या चित्रपटातील अभिताभ बच्चन यांच्याबरोबर केलेले काम संस्मरणीय झाले होते. वर्ष 2004 मधील “वेलेनाक्ष्त्रम’ आणि “सत्यम’ या दोन चित्रपटांतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला होता.ती त्यावेळच्या तिच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारी बालकलाकार होती. तिने काही मालिकांमध्येही अभिनय केला होता.
एखाद्याला आपल्या मृत्यूची चाहूल लागते की काय असा प्रश्न पडणाऱ्या घटना घडतात. तरुणी अतिशय खोडकर आणि मिश्कील स्वभावाची मुलगी होती. 11 मे 2012 रोजी तरुणी नेपाळच्या सहलीला जाण्यापूर्वी तिने आपल्या सर्व मित्रांना मिठी मारली आणि गमतीने असे म्हणाली की, “मी तुम्हाला शेवटचे भेटत आहे.’ विमानात बसल्यावर विमान आकाशात झेपावण्या आधी तिने आपल्या जीवलग मैत्रिणीला विमान कोसळल्यास काय होईल? असा संदेश पाठविला होता. खरोखरच अशी बोला फुलाला गाठ पडणे तसेच एकाच तारखेला जन्मयोग व मृत्युयोग असणे अशा गोष्टी अभावानेच घडतात. नियतीच्या मनात काय असते हे कोणालाच काळत नाही.
पूर्वी मर्फी जाहिरातीमधील एक लहान बाळ होते ते दृष्ट लागून गेले अशी अफवा उठली होती. काकतालीय न्यायाने अशा गोष्टींना अंधश्रद्धाळू दृष्ट लागणे असे समजतात. काही असले तरी तिचे चटका लावून जाणे नियतीनेच ठरविले होते.
– माधव विद्वांस