शिरूर -करोनाची दहशत असताना शेकडो किलोमीटर पायी गावी निघालेल्या मुलीला अपघात झाल्यानंतर गंभीर अवस्थेत मुलीच्या उपचारासाठी वडिलांच्या खिशात शंभर रुपये होते. परंतु शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटलचे डॉ. अखिलेश राजूरकर यांनी माणुसकी व सेवाभावीवृत्तीतून तात्काळ उपचार केल्याने 17 वर्षांच्या मुलीला जीवदान मिळाले आहे. डॉ. राजूरकर व डॉ. योगेश महाजन यांच्या सेवाभावीवृत्तीची प्रचिती पुन्हा आली आहे.
मुलीच्या कुटुंबीयांची जेवणापासून ते औषधोपचाराचा सर्व खर्च श्रीगणेशा हॉस्पिटलने उचलला आहे. कारेगाव येथे बळीराम जाधव हे पत्नी व मुलासह रात्रीच्या वेळी गावी पायी निघालेले होते. कारेगाव येथून निघालेल्या बळीराम जाधव यांची मुलगी जयश्री जाधव (वय 17, रा. विरळा, ता. दिग्रस, जि. यवतमाळ) हिचा अपघात झाला. यावेळी तिच्या डोक्याला दुखापत झाली होती.
यावेळी स्थानिकांनी तात्काळ श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये मुलीला दाखल केले. हॉस्पिटलचे संचालक, डॉ. अखिलेश राजूरकर डॉ. विशाल महाजन यांनी मुलीची परिस्थिती पाहून तात्काळ उपचार सुरू केले. अपघाताची माहिती कळताच वनमंत्री संजय राठोड, पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांनी जखमी मुलीची विचारपूस करून उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी डॉ. राजूरकर यांनी मुलीची सर्व जबाबदारी आता माझी आहे. तुम्ही निर्धास्त राहा, असे त्यांनी मंत्री राठोड आणि आमदार नाईक यांना आश्वस्त केले. मुलीचे सर्व उपचार मोफत करीत रुग्णाच्या नातेवाइकांना धीर दिला.
मुलीचे जीव वाचविण्यासाठी श्री गणेशा हॉस्पिटलचे डॉ. अखिलेश राजूरकर, डॉ. विशाल महाजन, डॉ. सारंग पाठक, डॉ. सौरभ पाठक, डॉ. राजेंद्र ढोले, डॉ. विष्णू मोरे, सूरज खरात,अविनाश अखंड, ऋतुराज चव्हाण, ऋषिकेश चव्हाण, विक्की नाईक, संगीता कोल्हे, वैशाली पडवळ यांनी सहकार्य केले.