स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीवरून उलट-सुलट चर्चा करण्यात येत आहे. वास्तविक, शिवसेनेने पक्षात कधीही जातीवादाला थारा दिलेला नाही. स्वीकृतसाठी जी नावे अंतिम झाली, ती नावे स्वत: दिवंगत उपनेते अनिल राठोड यांनीच ठरविली होती. मग त्यात जातीवाद कसा? असा सवाल गणेश कवडे यांनी उपस्थित केला आहे.
उपनेते अनिल राठोड हयात असताना काका शेळके यांनी त्यावेळी या नावांना विरोध का केला नाही? शेळके यांचा विरोध फक्त मराठा समाजाला आहे. संपर्कप्रमुखांना बदलण्याच्या काका शेळके यांच्या मागणीच्या पाठिमागे बोलविता धनी कोण आहे? हे शिवसैनिक व नगरकर जाणून आहेत.
शिवाय काका शेळके दुसऱ्या पक्षातून शिवसेनेत आलेत. त्यामुळे त्यांना पक्षनिष्ठेविषयी बोलण्याचा अधिकार काय? असाही सवाल कवडे यांनी उपस्थित केला आहे. शेळके यांना सावेडी विभागप्रमुखपद देण्यात आले. त्याचा पक्षाला किती फायदा झाला? याचे आत्मपरीक्षण करुन सावेडी विभागात पक्ष संघटनेसाठी केलेल्या कार्याचा खुलासा शेळके यांनी जाहीरपणे करावा, असे आव्हान कवडे यांनी दिले आहे.
सावेडी विभागात एकही शाखा, शाखाप्रमुख व नवी कार्यकारिण शेळके यांना करता आलेली नाही. त्यामुळे पक्षात राहून फक्त स्वहिताचे आरोप करण्याऐवजी शेळके यांनी पक्षवाढीसाठी काहीतरी करुन दाखवावे, असा सल्लाही कवडे यांनी दिला आहे.