नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रारात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी राज्य सरकारने १ व ५ डिसेंबर रोजी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरून अजित पवार हे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका करत “अशा प्रकारचे नवीन पायंडा पाडणे चुकीचं आहे”, असल्याचे म्हटले आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेतअजित पवार बोलत होते.
अजित पवार यांनी,“शेजारच्या राज्यात निवडणुका आहेत म्हणून आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांना सुट्टी देणं योग्य नाही. निवडणुका या दर पाच वर्षांनी येतात. यापूर्वी असं कधी घडल्याचे मला आठवत नाही. आम्हीही १५ वर्ष सत्तेत होते. त्यावेळी मध्यप्रदेश, गोवा आणि कर्नाटकात निवडणुका झाल्या. मात्र, आम्ही कधी अशी पगारी सुट्टी दिली नाही, अशा प्रकारे नवीन पायंडा पाडणं चुकीचं आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
पुढे बोलताना “आज ३६५ दिवसांपैकी सर्व प्रकारच्या सुट्ट्या पकडून जवळपास पावणे दोनशे सुट्ट्या दिल्या जातात. त्यामुळे याचा आपण कुठं गांभीर्याने विचार केला पाहिजे, राज्याचा गाडा हाकताना अधिकारी सहा महिने पगारी सुट्टी घेत असेल आणि उर्वरित सहा महिने काम करत असेल, तर हा जनतेचा टॅक्स रुपाने आलेला पैशांचा गैरवापर आहे”, असेही ते म्हणाले.