मुंबई – ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हा मंत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समाजाला दिला. तोच बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर पुढे नेला, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काहींनी “बाळासाहेबांचे विचार छोडो और कॉंग्रेस के साथ भारत जोडो’ म्हणत त्या यात्रेत सहभाग घेतला आहे. त्यांना जनता कधीही माफ करणार नसल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला वारसा विचारांचा-स्वातंत्र्यवीर सावरकर ते बाळासाहेब ठाकरे विषयावर दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमास उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis उपस्थित होते pic.twitter.com/qlsQwxvKdD
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 16, 2022
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त “वारसा विचारांचा – स्वातंत्र्यवीर सावरकर ते बाळासाहेब ठाकरे’ या विषयावर दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, राम मंदिर आंदोलन असो, जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवणे असो किंवा अमरनाथ यात्रेला झालेला विरोध असो हिंदुत्ववादी विचारापासून त्यांनी कधीही फारकत घेतली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमानातील शिल्पावरील वाक्य हटवल्यानंतर तत्कालीन केंद्रीय मंत्री मणीशंकर अय्यर यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन त्यांनी केले होते याची आठवण याप्रसंगी करून दिली.
बाळासाहेबांचा हाच वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम आज बाळासाहेबांची शिवसेना करत असून त्यानुसार अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवणे असो, अशा अनेक लोकोपयोगी निर्णयातून बाळासाहेबांना आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिमान वाटेल असेच काम हे युती सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.