मुंबई : मागच्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. मे महिन्यात तब्बल ४० नागरिक दहशतवाद्यांकडून मारले गेले आहेत. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हे हत्यासत्र सुरूच आहे. कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची हत्या केली. विजयकुमार असे या बँक व्यवस्थापकाचे नाव आहे.
दरम्यान, काश्मीरमधील हिंदूंची हत्या करण्यात येत असल्याने देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच आता राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या प्रकरणी निषेध नोंदवला आहे.
ज्या पद्धतीने काश्मीर मध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत ते पाहता हिंदूंना सरकारने स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने तसच बंदुका आणि ते चालवण्याच प्रशिक्षण केंद्र सरकारने दिल पाहिजे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 3, 2022
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारने हिंदूना स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने द्यायला हवेत असे म्हटले आहे. “ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत ते पाहता हिंदूंना सरकारने स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने तसेच बंदुका आणि ते चालवण्याचे प्रशिक्षण केंद्र सरकारने दिले पाहिजे”, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
गेल्या महिन्याभरात दहशतवाद्यांनी आठ नागरिकांची हत्या केली असून, त्यापैकी तीन जण बिगरमुस्लीम सरकारी कर्मचारी होते. दोन दिवसांपूर्वीच कुलगाममध्येच दहशतवाद्यांनी रजनी बाला या शिक्षिकेची हत्या केली होती. त्याआधी १२ मे रोजी बडगाम जिल्ह्यात छदुरा तहसील कार्यालयात राहुल भट या लिपिकाची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.
भाजपा, काँग्रेसबरोबरच सर्वच राजकीय पक्षांनी या हत्यासत्राचा तीव्र निषेध केला आहे. काश्मीरमधील सुरक्षेची स्थिती गंभीर असल्याचे नमूद करत काँग्रेसने केंद्र सरकारला लक्ष्य केले. काश्मीरमधील नागरिकांना सुरक्षा पुरविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला.