मुंबई : देशातील बॅंकांमध्ये असणारा पैसा हा बहुसंख्य हिंदूंचाच असून तो सुरक्षित राहिलेला तर नाहीच पण अनेक हिंदू कुटुंबंही उद्ध्वस्त झाली आहेत. त्याला मोदी सरकारच जबाबदार आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
देशात धृवीकरणाच्या हिन राजकारणाकरीता हिंदू खतरें में,’ असे उर बडवून सांगितले जात असताना मोदींच्या राज्यात खरेच हिंदू खतरें में’, अशी स्थिती झाली आहे, असेही सावंत म्हणाले.
येस बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घातल्याने या बॅंकेत ठेवलेले पैसे काढण्यासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. याआधी पंजाब महाराष्ट्र बॅंकेतील घोटाळ्यामुळे आयुष्यभराची कमाई बुडाली.
आपला पैसा बुडाला या धास्तीने काहीजणांचे मृत्यूही ओढवले. नोटाबंदीमध्ये करोडो लोक रस्त्यावर आले, यात जवळपास 150 लोकांचा जीव गेला, त्यातही बहुसंख्य हिंदूच होते.
देशात आत्महत्या करणाऱ्या तरुण व शेतकरी आत्महत्यांमध्येही बहुसंख्य हिंदूच आहेत. आता तीच वेळ येस बॅंकेत पैसा असलेल्या लोकांवर आलेली आहे. या संकटाने हिंदूंच्या देवालाही सोडले नाही.
पुरीच्या भगवान जगन्नाथ मंदिराचे विविध राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये असलेले 545 कोटी रुपये एक महिन्याआधी याच येस बॅंकेत जमा करण्यात आले होते ते पैसेही आता बुडीतच जमा झाले आहेत.
नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या बॅंकांचे करोडो रुपये लुटुन पळून गेले तो पैसाही या देशातील बहुसंख्य हिंदूंचाच होता. या येस बॅंकेत 18238 कर्मचारी असून यातील जवळपास सर्वच हिंदू आहेत त्यांची नोकरीही धोक्यात आली आहे.
हे भीषण वास्तव पाहता हिंदूंना इतर कोणापासून नाही तर मोदी सरकारपासूनच जास्त धोका असून त्यांच्या नाकर्तेपणामुळेच हिंदूंची कष्टाची कमाई बुडाली तर आहेत पण अनेकजण रस्त्यावरही आलेत, असेही सावंत म्हणाले.
निर्बंधामुळे महाराष्ट्रातील 109 बॅंका अडचणीत
येस बॅंकेवर निर्बंध घातल्याने महाराष्ट्रील 109 बॅंका अडचणीत आल्या असून यात विदर्भातील मध्यवर्ती बॅंकांसह काही सहकारी बॅंका तसेच पतसंस्थांच्या ठेवीही याच बॅंकेत होत्या त्या आता अडचणीत सापडल्या आहेत.
परंतु बडोदा महानगरपालिकेच्या बडोदा स्मार्ट डेव्हलमेंट कंपनीचे 265 कोटी रुपये येस बॅंकेवर निर्बंध घालण्याच्या एक दिवसाआधीच काढून घेण्यात आले यातून मोदी-शहा यांना देशाची नव्हे तर फक्त गुजरातचीच काळजी असते हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. या महानगरपालिकेचे 905 कोटी रुपये येस बॅंकेत आहेत. मोदी-शहांनी बडोदा महापालिकेसारखेच किमान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कानात जरी सांगितले असते तरी ते या संकटातून वाचले असते पण गुजरातप्रेमापुढे त्यांना इतर कोणी दिसत नाही असेच म्हणावे लागते, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे.