सिमला – हिमाचल प्रदेशातल्या मंडी इथे 11,000 कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या जल विद्युत प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन आणि भूमिपूजन केले. रेणुकाजी धरण प्रकल्प, लुहरी टप्पा 1 जलविद्युत उर्जा प्रकल्प आणि धौलसीध जलविद्युत प्रकल्पाचा यात समावेश आहे.
“इझ ऑफ लिव्हिंग’ अर्थात जनतेचे जीवन सुखकर करणे हे सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक असून यामध्ये विद्युत अर्थात विजेची मोठी भूमिका आहे. आज उद्घाटन झालेले जल विद्युत प्रकल्प म्हणजे पर्यावरण स्नेही विकासाप्रती भारताच्या कटीबद्धतेचेच द्योतक आहे. नव भारताच्या बदललेल्या कार्यशैलीचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
पर्यावरणाशी निगडीत उद्दिष्टांची भारत वेगाने पूर्तता करत आहे त्याविषयी त्यांनी माहिती दिली. भारताने 2016 मध्ये, 2030 पर्यंत स्थापित विद्युत क्षमतेच्या 40 टक्के उर्जेची पूर्तता, बिगर जीवाश्म उर्जा स्त्रोतातून करण्याचे उद्दिष्ट ठेवले. या वर्षीच्या नोव्हेंबरमधेच भारताने हे उद्दिष्ट साध्य केले याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान राहील असे ते म्हणाले.
पर्यावरणाचे रक्षण करत भारताने विकासाला दिलेल्या गतीबद्दल संपूर्ण जग भारताची प्रशंसा करत आहे. सौर उर्जा ते जल विद्युत,पवन उर्जा ते हरित हायड्रोजन, नविकरणीय उर्जेच्या प्रत्येक स्त्रोताचा पुरेपूर वापर करण्यासाठी देश सातत्याने काम करत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.