कल्याण – ओमायक्रॉनने राज्यात खळबळ माजवली आहे. वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या नव्या व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगातच अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे देशोदेशींच्या सरकारांनी कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे निर्बंध लादण्यासोबतच आता लसींची सक्तीही केली जाते आहे.
संसर्ग असाच वाढत राहिला तर देशाला तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागू शकते. त्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने महत्त्वाचा इशारा दिला आहे. सर्वांनी करोनाचे दोन डोस घ्या. ज्या दुकानदारांनी डोस घेतले नसतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी आणि दुकानदारांना दिला आहे.
दरम्यान, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार निर्बंध लावण्यात आले आहे. तसेच रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जोपर्यंत जगातल्या सगळ्या देशांत लसीकरण होत नाही अथवा किमान 70 टक्के लोकांना लस दिली जात नाही, तोपर्यंत करोना आपला अवतार बदलत राहण्याची शक्यता असल्याचे या अगोदरच तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे करोनाला थोपवण्यासाठी लस आणि स्वयंशिस्त महत्वाची असल्याचे अधोरेखित झाले आहे.