नवी दिल्ली – दिल्ली भाजपचे प्रवक्ते तजिंदरपालसिंग बग्गा यांच्या अटकेवरून शुक्रवारी हाय-व्होल्टेज ड्रामा घडला. त्या एका कारवाईवरून तीन राज्यांच्या पोलिसांमध्ये थरार पहावयास मिळाला. बग्गा यांना दिल्लीतून अटक करून पंजाब पोलीस आपल्या राज्याच्या दिशेने निघाले. मात्र, त्यांना हरियाणा पोलिसांनी रोखले. त्यानंतर हरियाणामध्ये जाऊन दिल्ली पोलीस त्यांना परत घेऊन आले.
पंजाबच्या मोहालीमध्ये मागील महिन्यात 36 वर्षीय बग्गा यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरून बग्गा यांना अटक करण्यासाठी पंजाबचे पोलीस त्यांच्या दिल्लीतील घरी दाखल झाले. बग्गा यांना समवेत घेऊन पंजाबचे पोलीस पथक आपल्या राज्याच्या दिशेने रवाना झाले. मात्र, हरियाणाच्या हद्दीत स्थानिक पोलिसांनी पंजाब पोलीस पथकाला रोखले.
बग्गा यांना जबरदस्तीने घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने ते पाऊल उचलल्याचे हरियाणा पोलिसांनी म्हटले. तिकडे दिल्ली पोलीसही सक्रिय झाले. बग्गा यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दिल्ली पोलिसांच्या पथकाने तातडीने हरियाणा गाठले. ते पथक बग्गा यांना पुन्हा दिल्लीत घेऊन आले.
आता ते थरारनाट्य न्यायालयातही पोहचले आहे. पंजाब सरकारने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्या सरकारने पंजाब पोलिसांच्या पथकाला हरियाणात रोखण्यात आल्याच्या विरोधात दाद मागितली आहे. चिथावणीखोर वक्तव्ये आणि वैरभावना पसरवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांवरून पंजाबमध्ये बग्गा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून पंजाब पोलिसांनी कारवाईसाठी पाऊल उचलल्याचे समजते.
दिल्ली आणि पंजाबमध्ये आपची, तर हरियाणात भाजपची सत्ता आहे. दिल्लीत आपची सत्ता असली तरी तेथील पोलीस दल केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. काही काळापासून भाजप आणि आपमधील राजकीय संघर्ष तीव्र बनू लागला आहे. त्यातून बग्गा यांच्या अटकेवरून नाट्यमय घडामोडी घडल्याचे मानले जाते.