मुंबई – विरोधी पक्षाच्या वतीने किंवा काही लोकांच्या वतीने जाणूनबुजून अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था अडचणीत आली आहे, असे मानायचे काही कारण नाही, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देणार नाही. तसा कुणी प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
भोंग्यावरून राज्यात गेल्या काही दिवसात आंदोलने होत आहेत. तरीही राज्यातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे. पोलीस आपले काम योग्यपणे करत आहेत. विरोधी पक्षाकडून केवळ राजकारण सुरू आहे. यातून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न असताना भोंग्याचा प्रश्न काढला.
त्यातून अल्टिमेटम देणे, धमकी देणे असे प्रकार सुरु आहे. उद्या पोलिसांनी कारवाई केली तर पोलीस आणि सरकारला दोष द्यायचा. राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही असे प्रश्न उपस्थित करायचे. कुणीतरी सांगतो म्हणून मशिदीवरचे भोंगे काढा. ही काय हुकूमशाही आहे का? धमकी देण्याचा प्रकार बरोबर नाही असेही त्यांनी सांगितले.