टोल फ्री क्रमांकावर संकटाची माहिती कळवल्यास सर्व गावकऱ्यांना मिळणार संदेश
शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील औद्योगिक क्षेत्रात चोरी, दरोडा व आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. या यंत्रणेच्या मदतीने चोरी व दरोड्यांना आळा बसणार असल्याचे सरपंच संगिता कांबळे व उपसरपंच प्रकाश ढेरंगे यांनी सांगितले. गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल नंबर यंत्रणेत समाविष्ट करण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील संकटकालीन नागरिकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील, तहसीलदार लैला शेख, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी आवाहन केले होते. त्यादृष्टीने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सदाशिव शेलार यांनी गावोगाव ग्राम सुरक्षा यंत्रनेच्या कार्यप्रणालीचे प्रात्यक्षिक दत्तात्रय गोरडे यांच्या माध्यमातुन घेतले आहे.
तर कोरेगाव भीमा येथे झालेल्या प्रात्यक्षिकप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, सरपंच संगिता कांबळे, उपसरपंच प्रकाश ढेरंगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, आनंदा बाटे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राम सुरक्षा प्रणालीच्या माध्यमातून गावामध्ये पूर, वणवा, रासायनिक अपघात, भूकंप, आग, चोरी, दरोडा, लहान मुल हरविणे, अपहरण, महिलांची छेडछाड, वाहन चोरी, शेतातील पिकांची चोरी, गंभीर अपघात, बिबट्या, तरस, लांडगा यांचे हल्ले अशा आकस्मिक घटनांची माहिती मिळून बाधितग्रस्तांना संकटकालीन मदत मिळण्यासाठी परिसरातील गावांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे.
या यंत्रणेमधील प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांचा मोबाईल नंबर ग्राम सुरक्षा यंत्रणेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. यानंतर गावातील कोणत्याही नागरिकाला आपत्कालीन मदत मिळण्यासाठी 18002703600 या क्रमांकावर फोन करुन आपल्या बाबतीत घडत असलेल्या संकटाची माहिती देण्यात आल्यानंतर गावातील सर्व हजारो नागरिकांच्या मोबाईल क्रमांकार तात्काळ फोन करुन माहिती दिली जाते. कोरेगाव भीमा ग्रामपंचायत बरोबरच शिक्रापुर, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी गावांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यावर पुढाकार घेतला आहे.
ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे गाव सुरक्षित…
गेली पाच वर्षांत नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात पाचशेपेक्षा जास्त गावांनी गावच्या सुरक्षेसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेसाठी पुढाकार घेतला असून या यंत्रणेच्या माध्यमातून डोंगराला लागलेली आग, आगीपासून होणारी हानी व चोऱ्या दरोड्यांना आळा बसून गावातील नागरिक सुरक्षित राहण्याचा अनुभव हिवरेबाजार सारख्या गावाला आला असल्याचे हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी सांगितले.